महासंवाद
मुंबई दि.१
नंदीवाले समाजाच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात यावा असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले आहेत.
राज्यातील नंदीवाले समाज हा भटक्या जमातीमधील असुन तो आपल्या उदरनिर्वाहासाठी गावोगावी जाऊन आपली उपजीविका पार पाडतो. या समाजाच्या विविध प्रश्नांवर सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी त्यांनी समाजाच्या प्रतिनिधीं समवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, नंदीवाले समाजातील लोकांना जातींचे दाखले वितरित करण्यासाठी समता दूत तसेच महसूल विभाग यांच्या माध्यमातून राज्यात तालुका, गावनिहाय विशेष शिबिराचे आयोजन करून दाखले वितरित करण्यात यावेत. तसेच समाजातील लोकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. नंदीवाले समाज हा भटक्या जमातीमधील असल्याने मानीव दिनांकापुर्वीचे जातीचे पुरावे उपलब्ध नाहीत अशांसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत तपासणी करुन जातीचे दाखले वितरित करण्यात यावेत असे निर्देशही मंत्री डॉ. कदम यांनी दिले.
समाजाच्या विविध प्रश्नांवर समाजातील प्रतिनिधींनी आपल्या प्रमुख मागण्या यावेळी मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने जातीचे प्रमाणपत्र देताना सन 1961 पुर्वीचा पुरावा जोडण्याची अट शिथील करून सन 1980 पासुनचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा, समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना विनातारण रुपये 20 लक्ष एवढं कर्ज उपलब्ध करून देणे, घरकुल योजनेत गायरान जमीनीवर बांधण्यात आलेल्या घरकुलांना इतर सोयी मिळणे या मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, ‘बार्टी’चे महासंचालक धम्मज्योती गजभिये, अश्विनी यमगर, अवर सचिव, प्रकाश इंदूलकर, आदीसह नंदीवाले समाजाचे प्रतिनिधी सर्वश्री. संतोष पवार, बापूराव जाधव, अशोक भोसले, भिमराव मोकाशी, विश्वजित पवार आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS