आठवणीतले किस्से..... मी माझ्या राजकीय कारकिर्दीत पूर्ण समाधानी- राजवर्धनदादा शिंदे
सोसायटी संचालक ते कारखाना अध्यक्ष असा स्तिमित करणारा प्रवास....
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आमच्या घराण्यात सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक संचालक तथा माजी उपाध्यक्ष रामराव शिंदे हाच काय तो राजकीय वारसा...
मी स्वभावतःच युवकांचे संघटन करून धडपड करत होतो. मुरूम सोसायटीचा संचालक बनून सहकारात एन्ट्री केली. हळूहळू त्यापुढे जाऊन पवार कुटुंबाचा विश्वास, शेतकऱ्यांचा पाठिंबा आणि माझे संघटन कौशल्य यामुळे सोमेश्वर सारख्या राज्यातील नामांकित कारखान्याचा दोन वेळा अध्यक्ष बनलो... कारखान्याच्या माध्यमातून सभासदांसाठी भरीव काम करता आले... त्यामुळे मी पूर्ण समाधानी आहे....
अशा भावना सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी मांडल्या.
शिंदे यांनी सांगितले की, वडीलांचे चुलते तसेच सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक संचालक रामराव शिंदे एवढाच राजकीय वारसा होता. मी पुण्याच्या मॉडर्न हायस्कुल मधून माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत एलएलबीचेही शिक्षण घेतले. कॉलेजमध्येच असताना युवकांचे संघटन करण्याची आवड होती. मोठा समुदाय सोबत असायचा. श्रीनिवासबापू पवार यांची तिथेच मैत्री जुळली ती आजपर्यंत! त्यावेळी सुट्टीला गावाकडे आलो की युवक एकत्र यायचो. यातूनच कामे घेवून नेत्यांकडे जायचो, त्यावेळी शरदचंद्रजी पवारसाहेब मुख्यमंत्री होते. युवकांच्या विविध मागण्या घेऊन मुंबई ला वर्षा बंगल्यावर जायचो. तेंव्हा श्रीनिवासबापूंनी अजितदादाना भेटायला सांगितले. एक दिवस असाच काटेवाडी येथे दादांना भेटायला गेलो. दादांनी तू कामे आणत जा ती करू. साहेबांच्या विचाराचे काम करा असा स्नेहपूर्ण सल्ला दिला. भरपूर चर्चा झाल्यावर १९८८ सालापासून काँगेसचे काम सुरू केले. अजितदादा पवार आणि गुलाबराव ढवाणपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला युवक काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा घेतला. दादांचे सूर तसे जुळत गेले.
१९९२ साली मुरूम सोसायटीची निवडणूक झाली. मी संचालक झालो. त्यानंतर अध्यक्षही झालो.
वसंत काका जगताप व भगवानबापु कदम यांनी मुरूम सोसायटी मध्ये चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली. अजितदादांनी दुधसंस्था व पतसंस्था सुरू करण्याचा आग्रह केला व या संस्थांच्या माध्यमातून चांगले काम करता येते असा सल्ला दिला व त्यांच्या आग्रह नुसार संस्था सुरू केल्या
अजितदादा यांच्या सल्ल्याने १९९२ साली आंबामाता दूध डेअरीची स्थापना केली तर लगेचच दूध उत्पादकांना मदत व्हावी म्हणून १९९३ ला अजयश्री पतसंस्थेची स्थापना केली. एक वर्षात अडीच हजार दूध संकलन झाले. त्या माध्यमातून गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यास सुरुवात केली. दूध संस्था आणि पतसंस्था यांची सांगड घालत रोजचे १० हजार लिटरवर दूध कलेक्शन नेले.
हे काम पाहुन पक्षाने १९९५ साली बारामती दूध संघावर संधी दिली. सतीशमामांनी तिथे फॉर्म भरण्याचा सल्ला दिला होता. अजितदादा यांच्यामुले थेट एंट्रीलाच दूध संघाचा उपाध्यक्ष झालो. आणि पुढच्याच वर्षी अध्यक्ष झालो. मी अध्यक्ष असताना संघाचे तीन लाख लिटर दुध कलेक्शन झाले. प्रामाणिक कामाने साहेब आणि अजितदादा यांचा विश्वास प्राप्त करू शकलो. आणि दूध संघाचे काम पाहून पक्षाने दूध संघावर दुसऱ्यांदा संधी दिली. संचालक असतानाच २००२ साली सोमेश्वर कारखान्याला फॉर्म भरला. दूध उत्पादकांनी फॉर्म भरण्याचा आग्रह केला होता. पवारसाहेब, अजितदादा यांनी संचालक पदाची संधी दिली. कधी वाटलं नव्हतं पण आश्चर्यकारकरित्या अध्यक्षपदाची माळही गळ्यात पडली!! सोसायटी, दूधसंस्था, पतसंस्था तसेच दूध संघ यावर कामाचा अनुभव होता. उत्तम संघटक होतो. पण साखर कारखान्यात नवखाच होतो. एम साखर, एस साखर काय असते, साखर टेंडर काय असते हे देखील माहीत नव्हतं. मात्र शिकत गेलो. अधिकारी-कर्मचारी यांच्याशी मुक्त संवाद केला. सतत अभ्यास करत, माहिती घेत गेलो. कामगार आणि सभासदांना एक सारखा न्याय दिला. चार आकडी भावाची आणि एक तारखेच्या पगाराची सुरवात झाली. २००२-०३ साली दुष्काळ पडला. पर्यायी कार्यक्षेत्रातील ऊस क्षेत्रात घट झाली. २००४-०५ साली कारखाना बंद ठेवायचा असाच निर्णय झाला असताना त्याठिकाणी धाडसी निर्णय घेत कारखाना सुरू ठेवला आणि वेळेत साखर विक्री करून सभासदांचा खूप मोठा फायदा केला हे माझ्या आयुष्यातले दोन धाडसी निर्णय झाले. कारखान्याकडे केवळ 70 हजार टन ऊस होता. बंद ठेवण्याचा पर्याय पुढे येत होता पण आम्ही धाडस केले. राज्यभर फिरून आमच्या बॉडीतील काहींनी गेटकेंन मिळवून 1 लाख गेटकेन आणला. भाव 1185 रुपये बसला. साखर निर्यात करण्यात आजूबाजूचे कारखाने थांबले. भाव वाढण्याची वाट पहात होते. पण आम्ही साहेबांशी चर्चा करून सव्वा दोन लाख पोती निर्यात केली. सगळे शॉर्ट मार्जिन भरून निघून 1200 रुपये असा उच्चानकी भाव दिला. आजूबाजूचे कारखाने पोती घेऊन बसले आणि भाव पडले, अशी आठवण शिंदे यांनी सांगितली.
कारखान्याच्या विरोधकांना कधी वाईट वागणूक दिली नाही. हे सगळं सांभाळत असताना आमच्या काळात साहेब, दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर उद्योग समूहातील डिस्टलरी प्रकल्प हा पहिला प्रकल्प उभा राहिला आणि साखरेबरोबरच सोमेश्वर कारखाना इतर उत्पादन घेऊ लागला ही नव्या युगाची नांदी होती. साहेब तेंव्हा खूप समाधानी झाले. सोमेश्वर कारखान्याचे सभासद, कामगार, संचालक या सगळ्यांचे प्रेम मिळाले. आजही सभासद विश्वासाने, प्रेमाने व्यक्त होतात. यापेक्षा वेगळे काय पाहिजे?
सहकारातदेखील धाडसी निर्णय घेतले पाहिजेत. खासगीप्रमाणे व्यवस्थापन काळानुसार बदलले पाहिजे, प्रामाणिक भूमिका असेल तर अडचणीतही सभासद साथ देतात. साखर कारखान्यातील सर्वच पैसा ऊस दरासाठी वापरू नये, तो राखून ठेवावा असे सांगत सहकारी साखर कारखानदारी ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, त्याचं अंडच खावे ती कापून खाऊ नये, असाही सल्ला त्यांनी दिला.
जायचं होतं पळशी नायगावला.. पोहचलो सोळशी नायगवला...
अजितदादांनी एकदा गाडीत बसवलं.. म्हणाले चला नायगवला जायचं आहे...दादांची तब्बेत ठीक नव्हती. गाडी निरेपर्यंत गेली असेल तोच दादांची झोप लागली. आता माझ्या डोक्यात एकच नायगाव, ते म्हणजे सोळशी नायगाव... ड्रायव्हरला रस्ता दाखवत दाखवत सोळशी नायगावजवळ पोचनार तोच दादा उठले. म्हणाले, कुठं आहे आपण? दादांना म्हटले नायगाव ला...! दादा म्हणाले अरे सावित्रीबाई फुले यांच्या पळशी नायगावला जायचं होतं. तुम्ही हिकडं कूट आणलंय? दादा आधी खूप चिडले. मग हसत हसत आम्ही गाडी वळवून पळशी नायगवला गेलो!! हा एक आठवणीतला किस्सा राजवर्धनदादांनी सांगितला.
कारखान्याच्या अध्यक्ष झालेलो वडील पाहायला नव्हते
माझ्या वडिलांना कायम वाटायचं की कारखान्याचे संचालक व्हावे. मात्र त्यांची ती इच्छा अपूर्णच राहिली. मात्र ज्या वडिलांना कारखान्याचे संचालक होण्याची इच्छा होती, त्याच कारखान्याचा आपला मुलगा अध्यक्ष झाला होता. हे पाहायला वडील मात्र हयात नव्हते.
पवारसाहेबांचे अलोट प्रेम
दादांप्रमाणेच मी साहेबांना फोन करून सल्ला घ्यायचो. साहेबांचे माझ्यावर प्रेम होते. भीमाशंकर कारखान्याच्या शुभरंभाला त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये मला व सतीशमामा खोमणे यांना नेले होते. प्रवासात दिलीप वळसे पाटील यांच्या वडिलांशी झालेल्या मैत्रीचे किस्से सांगितले. वरून खालचे प्रत्येक गाव ते सांगू शकत होते. आपली डिस्टीलरी त्यांच्या आग्रहाने झाली. साखर निर्यातीवेळी त्यांचा सल्ला कोट्यवधी रुपये फायदा देऊन गेला.
COMMENTS