लॉकडाउन वाळू माफियांच्या पथ्यावर : महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष, उपमुख्यमंत्री पवार देणार का लक्ष?
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात महसुल, पोलिस प्रशासन आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने गावागावात बेकायदेशीर वाळू काढण्याचा सपाटा वाळू व्यवसायिकांनी लावला आहे. ग्रामीण भागातील ओढे, नाले, तलाव आणि निरा नदीतून रात्रीच्या वेळी बेसुमार वाळू उपसा केला जात असून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. महसूल अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे वाळू सम्राटांशी असलेले लागेबांधे आता लपून राहिले नसून बारामती तालुक्यात वाळू व्यवसायिकांनी मांडलेला उच्चाद उपमुख्यमंत्री अजित पवार बंद करणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरीक उपस्थित करत आहेत.
गेल्या चार महिन्यापासून बारामती तालुक्यात वाळू व्यवसायिक रात्रीच्या वेळी विविध ठिकाणाहून बिनधास्त वाळू चोरी करत आहेत. महसूल विभागाच्या तलाठी आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत संपूर्ण माहिती असूनही यावर कोणतीही कारवाई करण्याचे धाडस त्यांच्यात उरले नाही. निरा व काऱ्हाटी नदीतून रात्रीच्या वेळी हायवा ट्रक भरून शेकडो ट्रक तालुक्यातून जाणाऱ्या राज्य मार्गावर धावतात. अन्य वाहनांची रस्त्यावर गर्दी कमी असल्याने वाळू भरलेले ट्रक तातडीने इच्छित स्थळी पोहच केले जातात. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत थोडीशी कल्पना असते मात्र त्यांच्या कडील कर्मचारी वाळू वाहतूक करणाऱ्या चालकांना मोबाईलद्वारे संपूर्ण माहिती पुरवत आहेत. त्यामुळे वाहन चालक यांच्या तावडीत सापडत नाहीत. लागेबंध असल्याने आणि थेट पैसे मिळत असल्याने बारामतीत वाळू व्यवसायिकांवर कारवाई करण्यास कोण धजावत नाही. याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच लक्ष घालण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी
बारामती तालुक्यात अवैद्य धंदे खपवून घेणार नाही असा इशारा अजित पवार यांनी बारामती येथे दिला होता. मात्र वाळू माफियांकडून वारंवार शेतकऱ्यांना दमबाजी व शिवीगाळ केली जाते. अनेकदा शेताच्या जवळ असलेल्या ओढ्यातून रात्रीच्या वेळी वाळू काढली जाते. यामुळे शेजारील पिकांचे नुकसान होते. शेतकरी यावर काही बोलायला लागला तर काही पैसे देवून गप्प केले जाते किंवा थेट दमबाजी करत मारहाण करण्याची भाषाही वापरली जाते. यावर अजित पवार काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
COMMENTS