राजगड पोलिसांकडून विनामास्क बाहेर फिरणाऱ्यांकडून लाखांच्या घरात दंड वसूल
भोर : प्रतिनिधी माणिक पवार
कोरोनाचा रोगाचा गांभीर्य न घेता विना मास्क विनाकारण बाहेर पडणाऱ्या महाभागांना धडक दंडात्मक कारवाई करून राजगड पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. एकाच आठवड्यात २ लाख १४ हजार १०० दंडात्मक कारवाई करण्याचा विक्रम पोलिसांनी केला असून आत्तापर्यंत २ लाख ९८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणाऱ्यावर राजगड पोलिसांनी कारवाई करण्याचा धडाका सुरु ठेवल्याने बेशिस्तांनी धसका घेतला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील यांनी भोर तालुक्यात कडक पावले उचलली असून त्यानुसार राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी पोलीस ठाण्याचे हद्दीत धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असून मास्क अथवा तोंडाला रुमाल न बांधणाऱ्या ५०० रुपये दंड आकाराला जात आहे. आत्तापर्यंत १ हजार ३२ जणाकडून तब्बल २ लाख ९८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून विनापरवाना प्रवास १२०, सामाजिक अंतर न पाळणे ९२ डबलसीट, विनाकारण बाहेर पडणाऱ्या अशा शेकडो जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती गोपनीय विभागाचे सचिन काळे व गणेश लडकत यांनी दिली.
राजगड ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी माहिती देताना सांगितले कि, राजगड ठाण्यातील पोलीस कर्मचारी तसेच शिंदेवाडी खेडशिवापूर, किकवी या दूरक्षेत्रातील नेमलेल्या स्वतंत्र पोलिसांच्या पथकांनी नसरापूर, कापूरहोळ, भोरफाटा, किकवी, सारोळा, भोंगवली, संगमनेर तसेच महामार्गावरील शिंदेवाडी, वेळू, वरवेसह खेडशिवापुर परिसरातील श्रीरामनगर, कल्याण, शिवापूर आदी ठिकाणी साथीचे आजार आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणाऱ्यावर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याशिवाय सरकारी कामात अडथळा, सामाजिक अंतर न राखणे, जमाव करणे, विनापरवाना प्रवास, दुचाकी जप्त रस्त्यावर थुंकणे या कारवाई करण्यात येत असून परिसरात पोलिस गस्त घालत असल्याचे वेताळ यांनी सांगितले.
नसरापूर, कापूरहोळ, खेडशिवापुर, कोंढणपुरफाटा येथील सर्व व्यापारी आणि दुकानदारांनी आणि नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारे नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी सुद्धा अत्यावश्यक काम असल्यास तोंडावर मास्क घालूनच घराहेर पडावे.
विनायक वेताळ, पोलीस निरीक्षक ( राजगड ठाणे नसरापूर )
COMMENTS