सगर राजपूत समाजाचा संपूर्ण इतिहास समाजापुढे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती, इंदापूर, फलटण, दौंड व शिरुर तालुक्यात बहुसंख्येने असणा-या सगर राजपूत समाजाचा आठशे- नऊशे वर्षापूर्वीचा संपूर्ण इतिहास शोधण्यात या समाजातील तरुणांच्या भगीरथ प्रयत्नांना यश आले आहे.
शेगर या अपभ्रंश झालेल्या नावाने ओळखला जाणारा हा समाज मुळचा सगर राजपूत आहे. सुर्यवंशी असणा-या या कुळाची उत्पत्ती सगर राजापासून झाली आहे व त्या संदर्भातील वंशावळी देखील उपलब्ध आहेत.
हा समाज सौराष्ट्रातून महाराष्ट्रात कधी आणि कसा विस्थापित झाला याबद्दल माहिती देणारी एक चौपाई गुजरातमधील संग्रहालयातून संघटनेला नुकतीच प्राप्त झाली.
ही चौपाई नक्कीच भारतातील तमाम इतिहास संशोधकांना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक नवे दालन उघडणारी ठरेल.
शुभ सवंत बारा चोराण(सवंत १२९४) म्हणजे साधारणतः इस.सन १२३७ मध्ये काही सगर राजपूत भीमदेव सोळंकी या राजाबरोबर राजस्थानमधील बेलापूरहून काशलगढ, रतनागर( आजचे कशेळी,ता.राजापूर ,जि.रत्नागिरी) येथे असलेल्या कनकादित्य मंदिरात आले आणि तिथे काही महिने त्यांनी निवास केला. या कनकादित्य मंदिरातील आदित्य म्हणजे सूर्याची मुर्ती ही सौराष्ट्रातून समुद्रमार्गे कशेळी मध्ये आणणेत आली होती. या मुर्तीचे आणि सुर्यवंशी सगर राजपूतांचे कनेक्शन आहे. आजही गुजरातमधील सौराष्ट्रात सुर्योपासक सगर राजपूत समाज बहुसंख्येने आढळून येतो. अनेक ठिकाणी सगर राजपूतांनी सुर्यमंदिरे बांधली आहेत आणि त्यांना जमिनी दान दिलेल्या आहेत. त्याबद्दलची १५० पेक्षा जास्त दानपत्रे आणि ताम्रपट इंडियन अर्केलाॅजि आणि पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत. कदाचित भारतातील सर्वाधिक दानपत्रे आणि ताम्रपटांचा हा उच्चांक असू शकतो.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या चौपाई मध्ये हिंदुस्थान मध्ये अनेक प्रांतांमध्ये समकालीन कोण कोण राजे राज्य करत होते त्यांचे देखील वर्णन आहे. त्यावेळी प.महाराष्ट्रात आणि कोकण प्रांतात शिलाहार राजे राज्य करीत होते हा सर्वांना ज्ञात असणारा उल्लेख देखील आलेला आहे.
आज बारामती, इंदापूर इत्यादी तालुक्यात बहुसंख्येने आढळणारे वायाळ आणि वायसे याच आडनावाचे सगर राजपूत रणमलजी वायाळ,गंगदेव वायाळ, रेणकावजी वायसे, काकाजी गौंड इत्यादी मंडळी त्यावेळी कनकादित्य मंदिरात आलेची नोंद या चौपाई मध्ये पाहायला मिळते.
पुढे कोकण भूमीत काही वायाळांना परशुराम मंदिरातील पुजा-याने कोकणे हे आडनाव बहाल केले. आजही वायाळ आणि कोकणे ही एकमेकांची भावकी आहे. तसेच बारामती तालुक्यातील होळ या गावात असणारी ढगाई देवी ही वायाळांची कुलदेवी आहे. ही ढगाई कोकणातून होळमध्ये आलेची माहिती येथील पुजारी सांगतात ही उल्लेखनीय बाब आहे पण त्याहीपेक्षा जास्त उल्लेखनीय बाब म्हणजे गुजरातमधील पाटणजवळ देखील ढगाई मातेचे मंदिर आहे आणि ती गुजरातमधील सगर राजपूतांची कुलदेवी आहे.
या चौपाई संदर्भात अजूनही सखोल संशोधन गरजेचे आहे तरीसुद्धा सगर राजपूतांच्या महाराष्ट्रातील आगमनावर ही चौपाई प्रकाश टाकते म्हणून तिचे महत्व अनन्यसाधारण आहे.
एकंदरीतच या संशोधनाने सगर समाजात असणारा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे.
COMMENTS