सोमेश्वर रिपोर्टर टीम------
तरडोली ता .बारामती येथील ग्रामपंचायत सार्व निवडणूकीनंतर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेली नवनाथ जयसिंग जगदाळे यांची सरपंच निवड जिल्हाधीकाऱ्यांनी अवैध ठरवली आहे . सरपंच गुप्त मतदान निवड पद्धतीत निवडणूक निर्णय अधीकारी यांनी वैध ठरणारे मतदान अवैध ठरविल्याने प्रत्यक्ष निकालामध्ये बदल शक्य झाला असता व दोन्ही उमेदवारास समसमान मते पडली असती असा निष्कर्ष काढून जिल्हाधीकारी राजेश देशमुख यांनी सरपंच निवड प्रक्रीयेचे कामकाज रद्द ठरविले आहे .
तरडोली ग्रामपंचायत निवडणूकीनंतर सरपंच व उपसरपंच पदाची निवड कार्यक्रमासाठी दि . २५ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न झाला . यामध्ये सरपंच पदासाठी नवनाथ जयसिंग जगदाळे , विद्या हनुमंत भापकर यांनी अर्ज केला होता . तर उपसरपंच पदासाठी सागर पंडीत जाधव व महेंद्र जिजाबा तांबे यांनी अर्ज केला होता . उपसरपंच पदासाठी दोघांसाठी समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीनुसार महेंद्र तांबे यांची निवड करण्यात आली होती .
सरपंच पदाच्या गुप्त मतदान पध्दतीत नऊ सदस्यांच्या मतदानापैकी नवनाथ जगदाळे यांना चार मते पडली होती . दुसऱ्या उमेदवार विद्या हनुमंत भापकर यांना तीन मते पडली होती . तर एका सदस्याने गुप्त मतदान अर्जावर सही केल्याने तर दुसऱ्या सदस्याने सरपंच पदासाठी पात्र उमेदवाराच्या नावापुढे करावयाची खुण उलटी केल्याने या दोघांची मते बाद ठरवली होती . यामुळे विद्या हनुमंत भापकर , संतोष संपत चौधरी , नबाबाई सोमनाथ धायगुडे , स्वाती सतीश गायकवाड , महेंद्र जिजाबा तांबे यांनी पुणे जिल्हाधीकारी राजेश देशमुख यांकडे सरपंच निवड प्रक्रीया रद्दबातल होण्यासाठी अर्ज केला होता .
यानुसार विद्या भापकर यांचे वकील हेमंत भांड , हेमंत बंड यांनी मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडील यापूर्वीच्या आदेशामध्ये नमूद केलेल्या निष्कर्षानुसार मतपत्रीकेवर केलेल्या चिन्हामुळे त्या मतदाराला कोणाला मत देयचे हे स्पष्ट झाल्यास असे मत बाद न करता त्या उमेदवाराला मिळाले हे मान्य करावे असा युक्तीवाद केला होता . यानुसार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा युक्तीवाद ग्राह्य धरून एका मतदाराचे मतदान चुकीच्या पद्धतीने बाद ठरविल्याने सरपंच निवड प्रत्यक्ष निकालामध्ये बदल शक्य झाला असता व नवनाथ जगदाळे यांना चार मते तर विद्या भापकर यांना चार मते पडली असती असा निष्कर्ष काढला असून दि २५ फेब्रुवारीची सरपंच पदाची झालेली निवड रद्दबातल ठरवली आहे .