सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
काही कुटुंबे ही ख-या अर्थाने समाजाला दिशा दाखविणारी असतात आणि त्या कुटुंबाचा प्रभावही कायमच समाजावर दिसतो. बारामती पंचक्रोशीतील असेच एक प्रभावशाली कुटुंब म्हणजे पवार कुटुंबिय. गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांनी त्यांच्या काळात समाजव्यवस्था कशी असावी आणि कुटुंबातील प्रत्येकाने विशेषतः महिलांनी स्वावलंबी असावे असा आग्रह केला होता. या दोन्ही कुटुंबप्रमुखांचा वारसा पुढे त्यांच्या मुलांनी चालविला आणि आता त्यांची नातवंडे अगदी पतवंडेही पुढे चालविताना दिसतात.
पवार कुटुंबियात गोविंदराव पवार यांच्या घरात जन्मलेले असेच एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणून अनंतराव पवार यांचा उल्लेख करावा लागेल. कुटुंबातील प्रत्येकाला स्वताःच्या मताप्रमाणे नोकरी किंवा व्यवसाय निवडण्याचा अधिकार अगदी त्या काळातही मिळालेला होता, त्या नुसार अनंतराव पवार यांनीही शेतीसोबतच चित्रपटांबाबत काहीतरी करण्याचा मार्ग निवडला होता.
उच्च शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी चित्रपटाच्या आवडीमुळे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडीओमध्ये काही काळ नोकरी केली होती. सौ. विजया पाटील, अजित पवार, श्रीनिवास पवार व नीता पाटील ही चार भावंड...ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार हे राजकारणात असल्याने या कुटुंबाभोवती मोठ वलय होत. त्या नंतर अजित पवार यांच्यातील नेतृत्व गुण हेरुन शरद पवार यांनी त्यांना हळुहळू बारामतीच्या राजकीय वर्तुळात संधी दिली.
छत्रपती कारखान्याचे संचालक, जिल्हा बँकेचे संचालक असा प्रवास सुरु असतानाच अचानकच शरद पवार यांना राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा प्रसंग आल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांना आमदार म्हणून संधी मिळाली. अचानक झालेल्या घडामोडीनंतर पुन्हा त्यांना खासदार म्हणून दिल्लीत जाण्याचा प्रसंग आला, पण तो काही काळापुरताच होता. त्या नंतर पुन्हा आमदार म्हणून ते राज्याच्या राजकारणात स्थिरावले ते आजतागायत त्यांचे काम सुरुच आहे. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदा पर्यंत त्यांची वाटचाल राज्याने पाहिली आहे.
त्यांचे वडील अनंतराव पवार यांनी त्यांच्यावर जे संस्कार केले, अनेक गोष्टींचे बाळकडू दिले त्याचा प्रभाव त्यांच्या कारकिर्दीवर कायमच दिसला. अनंतराव व आशाताई या वडील व आईच्या लहानपणापासून मिळालेल्या शिकवणूकीच्या पावलावर सर्वच भावंडांनी वाटचाल केली व आज ही सर्वच भावंड आपापल्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर आहेत.
पवार कुटुंब एकमेकांशी घट्ट जोडले गेले आहे, त्यांच्यातील नातेसंबंध कायमच मधुर आहेत, त्यात अप्पासाहेब, अनंतराव, वसंतराव, शरदचंद्र तसेच प्रतापराव या प्रमुखांमुळे हे कुटुंब अधिक व्यापक झाल पण कायमच परस्परांशी जोडून राहिल. याकुटुंबावर कुटुंबातील घटकांवर अनेकदा टीकाटीपण्णी झाली अनेकदा त्यांच्यावर संकटाचे प्रसंग आले, पण कुटुंबातील ऐक्यामुळे सर्व संकटातून ते निभावून गेले.
अनंतराव पवार यांची 13 जानेवारी ही पुण्यतिथी.....आज त्यांचे स्मरण करताना त्यांनी या राज्याला अजितदादांसारखा एक नेता दिला, श्रीनिवास, विजया पाटील, नीता पाटील यांच्यासारखी रत्ने दिली, याचा सर्वांनाच अभिमान वाटतो. बारामतीच्या सर्वांगिण विकासात अजितदादांचे योगदान निर्विवाद आहे, झपाटल्याप्रमाणे ते या पंचक्रोशीच्या विकासासाठी कार्यरत आहेत. अनंतराव पवार यांच्या या सुपुत्राने या परिसराचा कायापालट केला आहे, राज्यातील सर्वात सुंदर शहर बनविण्याचे स्वप्न त्यांनी साकारले आहे. अनंतराव पवार यांच्या विचारांचा वारसा केवळ कुटुंबियांसाठीच नाही तर सर्वांसाठीच प्रेरणादायी असाच आहे. त्यांना आज त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.......
COMMENTS