सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
नैसर्गिक वाढ, प्रगती आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे जमिनींचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. जमीन हा सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. त्यामुळे स्थावर मिळकतीमध्ये जमीनीला अनन्यसाधारण महत्व आहे. जमीन खरेदी विक्रि मध्ये होत असलेली वाढ, नवीन प्रकल्प, विकास आराखडे, प्लॉटींग, हिस्सेवारी इत्यादी कारणांमुळे जमीन मोजणीला खूप महत्व आले आहे. दरवर्षी १० एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सर्वेक्षण दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
पूर्वीच्या काळी राजेशाही, संस्थाने यांच्या हद्दी कशा ठरत असत, जमीन कशी मोजली जात होती. हद्दीचे वाद कसे सोडवले जात होते. अशा अनेक प्रश्नांबाबत कुतूहल निर्माण होणे स्वाभावीक आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात 'शिवशाही काठी' हे एकक जमीन मोजणीसाठी वापले गेले होते. त्यानुसार जमिनीची प्रतवारी करून बिघा, चावर मध्ये जमीनीचे क्षेत्रफळ मोजले जात.
कालांतराने इंग्रजांची राजवट भारतात प्रस्थापीत झाली. राज्य व्यवस्थापन आणि महसूल वसुलीसाठी जमिनीची तांत्रीक पद्धतीने मोजणी सुरू करण्यात आली. भारतातील जमीन मोजणी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना १७६७ साली करण्यात आली. कॉलिन मॅकेन्झी हे भारताचे पहिले सर्व्हेअर जनरल होते. सार्वभौम भारताच्या जमिनीची मोजणी करून आवश्यक नकाशे अभिलेख उपलब्ध करून देण्याचे काम सर्व्हे ऑफ इंडिया करते. या संस्थेचे मुख्यालय डेहराडून येथे आहे. १० एप्रिल १८०२ या दिवसापासून भारतामध्ये महात्रिकोणमित्तीय (Great Trigonometrical Survey - GTS) पद्धतीचे सर्वेक्षण विल्यम लॅम्बटन यांनी सुरू केले. तेंव्हापासून भारतामध्ये १० एप्रिल हा राष्ट्रीय सर्वेक्षण दिन साजरा केला जातो.
पृथ्वी गोल असली तरी ती चेंडू सारखी गोल नसून काहीशी अंडाकृती आहे. त्यालाच 'जिऑईड' असे भौगोलीक नाव आहे. जमीन मोजणी करताना पृथ्वीची गोलाई विचारात घेतल्यास त्यास जिओडेटिक सर्व्हे म्हटले जाते. आणि ज्या मोजणी प्रकारात गोलाईचा विचार केला जात नाही किंवा सर्व जमीन समतल आहे असे समजून मोजणी प्रक्रिया केली जाते त्यास प्लेन सर्व्हे म्हणतात. १९५६ पूर्वी जमीन एकर आणि गुंठ्यामध्ये मोजली जात होती. सध्या हेक्टर, आर आणि चौरस मीटर मध्ये जमीनीचे क्षेत्रफळ नमूद केले जाते. पूर्वी साखळी चा वापर करून मोजणी केली जात असे त्यामध्ये गुंटूर, रेव्हेन्यू, मेट्रिक आणि इंजिनियरींग साखळी वापरली जात होती. शंकू साखळी पद्धतीच्या जमीनीच्या मोजणी प्रकारात टिपणबुक महत्वाचे असत. त्यासाठी वसलेवार पद्धतीने जमीनीचे क्षेत्रफळ काढले जायचे. पुढे समतल फलक (Plne Table) उपकरणाच्या सहायाने जमीन मोजणी करण्यात येऊ लागली. प्लेन टेबल सर्व्हे तुलनेने सोपा असल्याने फार काळ प्लेन टेबलने मोजण्या केल्या जात होत्या. तांत्रिक सर्वेक्षणासाठी थिओडोलाईट हे उपकरण निर्माण झाले. फक्त अंतरे मोजून अचुकता मिळत नव्हती. अंतर्गत कोन मोजणे अनिवार्य झाले. तेंव्हा थिओडोलाईट या उपकरणाचे महत्व अधोरेखित झाले. थिओडोलाईट हे उपकरण जमीन मोजणी क्षेत्रामधील मैलाचा दगड असलेले महत्वपूर्ण उपकरण ठरले. अचुकता हे मोजणी शास्त्रातील महत्वाचा मापदंड आहे.
दिवसेंदिवस जमीनीचे दर वाढतच आहेत. इंच इंच जागेला किंमत आल्याने मोजणीमध्ये गती व अचुकता यावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आहे. डिजीटल थिओडोलाईट नंतर टोटल स्टेशन, डिजीपीएस ( Diffrential Global Positioning System) या उपकरणांचा सध्या जमीन मोजणीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. टोटल स्टेशन मध्ये इनबिल्ट डिजीटल थिओडोलाईट EDM (Electronic Distance Meter) असल्याने अचुक मोजणी शक्य होते. महाराष्ट्र शासनाच्या भूमिअभिलेख खात्याने देखील नवीन तंत्राचा वापर मोजणीसाठी सुरू केलेला आहे. मोजणी क्षेत्रात नव्याने GNSS (Global Navigation Satelite System) प्रणालीचा वापर होत आहे. यामध्ये उपग्रहाद्वारे जमीनीचे अक्षांश व रेखांश मिळविले जातात आणि संगणक प्रणालीद्वारे नकाशांचे आरेखन केले जाते. राज्यात सर्व्हे ऑफ इंडियाच्या सहकार्याने ७७ ठिकाणी कॉर्स (Contineous Operation Reference Station) उभारले आहेत. या कॉर्सच्या आधारे जीपीएस रीडींग ३० सेकंदात घेता येतात. त्यामुळे जमिनीची मोजणी ३० ते ३५ मिनीटात करता येणे शक्य झाले आहे. मिळकत धारकांना त्यांच्या मिळकतींचे नकाशे, मालमत्तापत्रक लवकर मिळावेत. नवीन मालमत्तांचा शोध यासाठी ड्रोन सर्वेक्षण ही सुरू करण्यात आले आहे. परंतू, त्यासाठी संबंधित खात्यांच्या पूर्वपरवानग्या आवश्यक असतात. मोजणी केल्यानंतर जमीन मालकांना मोजणीच्या नकाशांची 'क प्रत' भूमिअभिलेख विभागाकडून देण्यात येते. सध्या गाव नकाशे, गट नकाशे, डी.पी.नकाशे संदर्भासाठी वापरले जातात. सर्व्हे ऑफ इंडिया च्या सहकार्याने 'नक्शा' ही नागरी भागातील मिळकतींची मोजणी योजना सुरू होत आहे. लहान लहान होत चाललेले जमीनीचे तुकडे, नवीन पायाभूत सुविधा, निवासी प्रकल्प, विकास आराख़डे, रस्ते बांधणी यामुळे येणारा काळ हा जमीन मोजणी क्षेत्रासाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे. तसेच, या क्षेत्रातील कौशल्यपूर्ण अभियंत्यांनाही रोजगार उपलब्धतेस अधिक वाव देणारा निश्चित असेल अशी माहिती पुण्यातील औंध येथील विश्वेश्वरय्या ॲकॅडेमीचे संचालक पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
...............................