Pune News l पुणे व सातारा ग्रामीण जिल्ह्यात ऑगस्टच्या 'या' तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:०५ वाजल्यापासून ते २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. तर सातारा जिल्ह्यात २० ऑगस्ट पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. 
          या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
         सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोट कलम (३) अन्वये पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.
        आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
--------------
सातारा जिल्हात 20 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी
सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम  (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम  37 (1) (3) अन्वये दिनांक   20 ऑगस्ट 2025 रोजीच्या  रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमाव बंदी आदेश जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केला आहे.
               ज्या लोकांनी शांततेचा मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल त्याचवेळी पोलीस विभागाची (पोलीस अधिक्षक/संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक) यांची लेखी पूर्व परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Tags
To Top