मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी सोपान चव्हाण हे आपली चार ते पाच जनावरे खाजगी मोकळ्या माळरानावर चारण्यासाठी घेऊन गेले होते. त्याचवेळी जोरदार वारे व पाऊस सुरू झाला. अचानक महावितरणची वीजवाहक तार तुटून जनावरे चरत असलेल्या ठिकाणी जमिनीवर कोसळली. दुर्दैवाने या तारेला स्पर्श झाल्याने चव्हाण यांच्या घाबन म्हशीला जोरदार विजेचा धक्का बसला आणि ती जागेवरच कोसळून दगावली.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रवीण गायकवाड व वायरमन प्रकाश चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पंचनाम्यातील तपशील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून, शेतकऱ्याला भरपाई मिळण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, शेतकरी संघटनेकडून तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत व योग्य ती भरपाई मिळावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.