'सोमेश्वर' च्या सभासदांचे टनाला ३०० रुपयांनी प्रपंच जळाले : पी. के. जगताप
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
यावर्षी सोमेश्वर आणि माळेगाव कारखान्याने ऊसाचे अंतिम दर दिले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रतिटन ३०० रुपयांना सभासदांचे प्रपंच जळाले आहेत. याला जबाबदार कोण ? असा सवाल करून दोन्ही पैकी एकतरी कारखाना विरोधात असल्याशिवाय दर चांगला मिळत नाही हे आज सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांना दर चांगला मिळण्यासाठी सोमेश्वर कारखान्यात सत्तांतर आवश्यक असल्याचे मत सोमेश्वर चे माजी संचालक पी. के. जगताप यांनी व्यक्त केले.
सोमेश्वर कारखान्याने दिवाळीसाठी अवघे टनाला १०० रुपये बिल काढल्यामुळे सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना पी. के जगताप म्हणाले, एकहाती सत्ता आल्यामुळे संचालक मंडळ मनमानी कारभार करत आहे. कोरोनाचा फायदा घेत वार्षिक सभेची कोणतीही परवानगी न घेता करोडो रुपयांची कामे सुरू आहेत. गेल्या वर्षी ऊसदरासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली होती. हे पैसे फक्त ऊसाच्या दरासाठीच वापरले जातात मग ती रक्कम कुठे गेली. केंद्रातील भाजप सरकारच्या निर्णयामुळे साखरेला प्रतिक्विंटलला ३१०० रुपये दर मिळत असल्याने साखर कारखाने शॉर्ट मार्जिन मधून बाहेर निघाले, साखरेबरोबरच इथेनॉल अल्कोहोल ला चांगले दर आहेत. विजेलाही चांगला दर आहे. मग गेल्या वर्षिचे ऊसदराचे २० कोटी आणि यावर्षीचे हे सगळे पैसे नक्की गेले कुठे असा सवाल जगताप यांनी केला आहे. अध्यक्ष यांनी नुकत्याच गव्हाण पूजन कार्यक्रमात सभासद आणि कामगार यांची दिवाळी गोड करणार असे सांगितले होते, प्रत्यक्षात मात्र २७ हजार सभासदांची दिवाळी कडू झाली असल्याचे जगताप म्हणाले.
सोमेश्वरचे ८० टक्के सभासद हे छोटे शेतकरी असून त्यांचा ऊस ४० ते ८० टन जात असतो. दिवाळी च्या मिळणाऱ्या उसाच्या बिलावर किराणा माल, कपडे, उसाची खांदनी, बांधणी, खते, गेल्या वर्षीच्या मशागतीची बिले असे नियोजन असते,मात्र कारखान्यांनी अवघ्या १०० रुपयांवर बोळवण केल्याने सभासदांच्या दिवाळी सणावरच पाणी पडले आहे.
ज्यावेळी माळेगाव कारखाना विरोधी गटाकडे होता त्यावेळी सोमेश्वर आणि माळेगाव कारखान्यात ऊसदराची चढाओढ लागत होती. आज दोन्ही कारखाने राष्ट्रवादी कडे आहेत. मग ३०० रुपये कमी देण्याचा निर्णय कोणी घेतला? हे पैसे कोणाच्या खिशात गेले ? असा सवाल करून येत्या दोन तीन महिन्यात सोमेश्वर ची निवडणूक लागत आहे. चांगल्या ऊसदरासाठी सोमेश्वर मध्ये सत्तांतराशिवाय पर्याय नसल्याचे जगताप यांनी सांगितले.
सोमेश्वर साखर कारखान्यामध्ये काम करत असताना चुकीच्या पद्धतीने काम सुरु असून साखर आयुक्त पुणे व कार्यकारी संचालक यांना अनेक तक्ररी दिल्या असून अजुनही त्यांची दखल घेतली जात नाही. सोमेश्वर साखर कारखान्याची रिकवरी माळेगाव साखर कारखान्यापेक्षा चांगली असल्यामुळे रिकवरी गेनमध्ये करोडो रूपयांचा फायदा झाला आहे. असे असताना सोमेश्वर कारखान्याने जाणीवपूर्वक कमी भाव देऊन सभासदांची पिळवणूक केली जात आहे. मागील वर्षी पेक्षा महागाई वाढत असताना भाव कमी करणे कितपत योग्य वाटत आहे याचा विचार चेअरमन यांनी केला आहे का?
सोमेश्वर साखर कारखाना हा काही राजकारणाचा अड्डा नसून ३०००० - ४०००० सभासद व कामगारांच्या कुटुंबाच्या प्रपंच्याचा प्रश्न आहे. असे असताना खाजगी कारखान्यांचे हित जोपासण्यासाठी सोमेश्वर व माळेगाव साखर कारखान्याने ऊसाचे दर कमी काढून सभासदांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सोमेश्वर चे चेअरमन व संचालक मंडळाला आमचे जाहीर आवाहन आहे की, भाव बसत असताना देखील जाणीवपूर्वक भाव कमी काढला असल्याचा आरोप सोमेश्वर चे माजी संचालक पी.के.जगताप पुणे बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे, प्रा.बाळासाहेब जगताप विठ्ठलराव पिसाळ, अशोकराव खलाटे यांनी केला आहे.
COMMENTS