माणिक पवार
भोर : प्रतिनिधी
गावापासून दीड किलोमीटर अंतरावर डोंगररांगामध्ये असलेल्या खडीमशीन चालू - बंद करण्याबाबत पारवडी ( ता. भोर ) येथील ग्रामस्थांचे दोन गट आमने सामने येत आरोप - प्रत्यारोपाचे फैरी झडू लागली. यावेळी वादाचे प्रसंगावधान ओळखून भोर तहसीलदार अजित पाटील यांनी दोन्हीकडील ग्रामस्थांचे म्हणणे घेऊन अहवाल तयार करणार असल्याचे सांगितले.
भोर तालुक्यातील पारवडी गावच्या हद्दीत गेल्या दहा वर्षापासून खडीमशीन असून नुकताच याबाबत वाद उफाळला आहे. या पारश्वभूमीवर भोर तहसीलदार अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांमध्ये दोन गट असल्याचे दिसून आल्याने तहसीलदार अजित पाटील यांनी दोन्ही गटाकडील ग्रामस्थांना सकारात्मक चर्चा करण्याचे आवाहन करून खडीमशीनची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार, शेतीची, विहीर आदीची पाहणी केली. यावेळी मंडलाधिकारी श्रीनिवास कद्देपल्ली, तलाठी जे. डी. बरकडे, नेहा बंड, अर्चना ठाकूर, ग्रामसेविका पाटोळे, पोलीस कर्मचारी अक्षय वायदंडे उपस्थित होते.
'आम्हाला कोणताही त्रास अथवा शेतीचे नुकसान होत नाही, आमच्या घरांना कोणताही तडा गेला नसल्याचे किसन लिम्हण, किरण शिळीमकर, राजराम लिम्हण, शिवाजी शिळीमकर, संतोष लिम्हण, सुलाबाई लिम्हण यांनी समर्थन केले. याबाबत विनोद मांगडे यांनी सांगितले कि, रितसर सर्व परवानग्या घेऊन आम्ही परवाना नुतनीकरण केले आहे. पर्यावरणाचे रक्षण व्हावे. धुळ उडु नये यासाठी स्प्रिंकलर सोय असून खडीमशीन भोवती उंच पत्र्याची संरक्षक भिंत उभी केली आहे. गावच्या राजकारणामुळे गेल्या दोन वर्षापासून आमच्या व्यवसायाला त्रास होत असून गावच्या विकासासाठी आमचे नेहमी योगदान राहिले आहे. खडीमशिन गावापासुन लांब असल्याने गावास कोणताही त्रास होत नसुन अनेक ग्रामस्थ आम्हाला सहकार्य करत आहेत. तर दुसऱ्या बाजूने खडीमशीनमुळे गावाला धोका होत असल्याचे पोलीस पाटील सुभाष लिम्हण यांनी तहसीलदार अजित पाटील यांच्याकडे बाजू मांडली आहे.