सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----------
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना गावाकडे पाठ फिरवली असल्याने गावातील ग्रामस्थांना कोणाचाही आधार उरलेला नाही. गावात रुग्णांची संख्या वाढत असताना स्वच्छता, रुग्ण तपासणी, येणाऱ्या- जाणाऱ्यांवर निर्बंध, लसीकरण यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. निवडणुका आल्यानंतर घराघरात जावून मते मागणाऱ्या आणि सर्वांची आस्थेने चौकशी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी संकट काळात गावाला वाऱ्यावर सोडून दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काही गावात मात्र युवक ग्रामस्थांना सर्वोपरी सहकार्य करत असल्याने याठिकाणी जवळपास निम्म्याहून अधिक ग्रामस्थांना लसीकरण करण्यात तरुणांना यश आले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करत आणि त्यांना विश्वासात घेत लसीकरणासाठी नागरीकांना प्रोत्साहन देणे, त्यांना आरोग्य केंद्रात नेत लसीकरण करवून घेणे, जनजागृती, स्वच्छता याबाबी ग्रामपंचायतीने करणे गरजेचे आहे. मात्र त्या होताना दिसत नाहीत. गावावर मोठे संकट असताना काही जण अजूनही राजकारण करत आहेत पर्यायाने चांगल्या गावाचे नाव खराब होत आहे. गावातील शाळा- माध्यमिक विद्यालये सध्या मोकळी आहेत सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना याठिकाणी दाखल करत त्यांना विलगीकरण करता येणार आहे मात्र अशा कोणत्याही उपाययोजना या भागातील ग्रामपंचायती करत नसल्याने बारामती शहरातील सर्वच रुग्णालयात बेड मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकाच ठिकाणी लसीकरण होत असल्याने आणि त्याठिकाणी गर्दीचा धोका पाहता नागरीक लसीकरण करण्यास टाळाटाळ करत आहेत. यावर ही काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायती कडून केवळ फायदा न घेता गोरगरिबांना मदत करणे गरजेचे असताना ग्रामपंचायत सदस्यांनी मागील महिनाभरात ग्रामपंचायतीची पायरीही चढलेली नाही. आरोग्य विभागावर असलेला ताण लक्षात घेता सर्वांनी एकमेकांना साथ देत या रोगाशी दोन हात करणे गरजेचे आहे. यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उंबरे झिजवणाऱ्यांनी त्यांना मदत करत आपले कर्तव्य पार पाडावे एवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
COMMENTS