सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे व्रुध्दापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते.
बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी आमदार म्हणून त्यांनी जनसेवा केली. जनता पक्ष व समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते. प्रदेश जनता दलाचे ते अध्यक्ष होते. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना व तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते.
राजकीय परिचय-----
राजकीय व सहकार क्षेत्रातील मोठे प्रस्थ म्हणून बारामती तालुक्यातील निंबूतमधील काकडे घराण्याचा नावलौकिक आहे. काकडे घराण्यास तशी ऐतिहासिक.पार्श्वभूमीही आहे. या घराण्यास सहकार क्षेत्रात मोठे यश मिळाले असले तरी
राजकीय क्षेत्रात संभाजीराव काकडे वगळता कुणालाही फारसे यश मिळू शकले नाही. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती आदी संस्थावर काकडे घराण्याची दीर्घकाळ हुकूमत होती. त्याच जोरावर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण केला
होता. या घराण्याचा अकलूजचे शंकरराव मोहिते-पाटील, पाटणचे पोलादी पुरुष समजले जाणारे बाळासाहेब देसाई, शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील, फलटणचे कदम, कोल्हापूरचे गायकवाड घराणे, वाणेवाडीचे जगताप घराणे आदींशी नातेसंबंध असल्याने व ही मंडळी विविध पक्षात असल्याने काकडे घराण्याचा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा होता. परंतु, निवडणुकीच्या राजकारणात संभाजीराव काकडे वगळता कुणालाही यश मिळू शकले नाही. दांडगा लोकसंपर्क, साधी राहणी, राजकीय डावपेचातील कौशल्य, कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी केलेले प्रयत्न, विविध विषयांवरील दांडगा अभ्यास, चिकीत्सक प्रवृत्ती, उत्तम संघटन या जोरावर संभाजीरावांनी राजकारणात झेप घेतली,
सन १९७८ मध्ये तर संभाजीराव करतील ती पूर्व दिशा असे समीकरण होते. केंद्रातील जनता राजवट सत्ता काळ पूर्ण करू न शकल्याने जनता पक्षाविषयी असलेले जनमानसातील आकर्षण कमी झाले. परिणामी या पक्षाचा जनाधारही कमी झाला, अशाही स्थितीत लाला यानी पुणे जिल्ह्यात जनता पक्षाची पताका फडकवत ठेवली होती. शरद पवार सन १९८८ मध्ये राज्याचे दुसऱ्यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर हळूहळू जिल्ह्यातील जनता पार्टीचे (जनता दल) अस्तित्व कमी होत गेले. त्यातच १९९२ मध्ये बाबरी मशिदीच्या आंदोलनानंतर हिंदुत्ववादाचा पगडाही वाढला. नव मतदार शिवसेना- भाजपच्या बाजूला गेला. त्यामुळे जनता दलात नवी पिढी येणेही बंद झाले. समाजवादी विचारांचा भांडवलशाही पक्षांपुढे निभाव लागणे कठीण झाले. त्यातच वाढत्या वयोमानामुळे लालांनी देखील १९९५ नंतर सक्रीय राजकारणातून एक्झिट घेतली. परंतु, नव नेतृत्व घडविण्याचे, त्यांना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कार्य आजतागायत सुरू होते. राजकीय कारकिर्दीत ते दोन वेळा खासदार व एकदा आमदार झाले.
राज्यसभेवर निवडून जाण्याचा त्यांचा प्रयत्न केवळ अर्ध्या मतामुळे असफल ठरला. दोनदा खासदारकी व एकदा आमदारकी भूषविणाऱ्या लालांनी राजकीयदृष्ट्या अज्ञात असणाऱ्या अनेकांना आमदार केले. त्यांना सत्तेची कवाडे उघडून दिली. कित्येकांना पक्षाचे पदाधिकारी केले. काहींना महापौर तर काहींना जिल्हा परिषदेचे अध्यक्षही केले. काही कार्यकर्त्यांना सहकारातील मानाची पदे बहाल केली. काहींना बँका, सोसायट्या सुरू करण्यासाठी मदत केली. लाला यांनी सत्तेचा, पदाचा वापर कधीही स्वार्थासाठी केला नाही. मोरारजीभाई देसाई, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर या तीन
पंतप्रधानांबरोबर त्यांचे अत्यंत घनिष्ट संबंध होते. परंतु, आजकालच्या नेत्यांप्रमाणे किंवा बारामती तालुक्यातील बडे प्रस्थ असलेलल्या नेत्यांप्रमाणे कधीही या संबंधांचा
वापर स्वतःची अगर नातेवाईकांची घरे भरण्यासाठी केला नाही. राजकारणात बड्या पदांवर असलेल्या नातेवाईकांच्या मदतीने कधीही सूडाचे राजकारण केले नाही. सत्तेचा व राजकीय संबंधाचा वापर कायम समाजाच्या भल्यासाठीच केला. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले लाला हे कायमच प्रलोभनांपासून दूर राहिले त्यांचे हे कार्य राजकारणातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिपस्तंभासारखे आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी
काकडे घराणे हे तसे ऐतिहासिक वारसा असलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी या घराण्याची निष्ठा होती. सुप्याची लढाई जिंकल्यामुळे शिवाजी
महाराजांनी या घराण्यास दिनकरराव व विश्वासराव हे किताब दिले होते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने काकडे घराण्याकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टीकोनही वेगळा होता. काकडे घराण्याची निंबूत (ता. बारामती) परिसरात मोठी शेतजमीन आहे लालांचे वडील साहेबराव काकडे हे एक नावाजलेल व्यक्तिमत्त्व होते. ब्रिटीशही त्यांना मान देत असत. मुंबईचे गर्व्हनर बारामती परिसरात शिकारीसाठी येत असत.
त्यावेळी ते आवर्जून साहेबराव यांची भेट घेत असत. गर्व्हनरशी असलेल्या घरोब्यामुळे समाजात तसेच सरकारी पातळीवर त्यांचा दबदबा होता. सरकारी कर्मचारी त्यांच्याशी आदबीने वागत असत. साहेबराव यांचे व्यक्तीमत्त्वही रुबाबदार असेच होते.
साहेबराव काकडे यांचा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीस दिशा देणारे वैकुंठभाई मेहता यांच्याशी अत्यंत निकटचा संबंध होता. त्यांच्याच प्रेरणेने साहेबराव यांनी।निंबूत-करंजे सोसायटीची स्थापना केली होती. ही राज्यातील पहिली सहकारी सोसायटी असून आजही कार्यरत आहे. त्यानंतर साहेबराव, माळेगावचे जाधवराव, साहेबराव देवकाते यांनी बारामती, पुरंदर व इंदापूर तालुक्यासाठी निरा कॅनॉल सोसायटीचा खरेदी विक्री संघ स्थापन केला. हा संघही आजतागायत सुरू आहे. साहेबराव हे अतिशय प्रगतशील शेतकरी होते. नवनवे तंत्रज्ञान ते आत्मसात करीत असत. पुंड्या ऊस लावणारे ते पहिले शेतकरी होते. त्यानंतर ४१९ जातीचा ऊस लावणारे पहिले शेतकरी।म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. साहेबराव काकडे जरी देशमुख असले तरी त्यांच्यावर सत्यशोधक चळवळीचे संस्कार होते. ते जातपात कधी मानत नसत. त्यांनी कधीही हुंडा घेतला नाही व दुसऱ्यालाही दिला नाही. देशमुख असूनही सुना मात्र पाटील घराण्यातील केल्या. मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता.लाला याची सासरवाडी वाणेवाडीचे जगताप याची होती. कै. रामराजे जगताप याच्या बहीण कंठावती ह्या लालाच्या पत्नी होत.
COMMENTS