सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील अजय सावंत या युवकाने राज्यातील ऑक्सिजन चा तुटवडा लक्षात घेता जो प्रकल्प उभा करण्यासाठी ३ महिने कालावधी लागतो तो प्रकल्प रात्रंदिवस काम करुन अवघ्या २० दिवसात उभारला आहे. त्याच्या या प्रकल्पाचा रोज १२०० रुग्णांना फायदा होत आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिति आहे कोविड रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजन सर्वत्र तुटवडा सुरू आहे. राज्यातील विविध कंपन्या तसेच साखर कारखाने ऑक्सिजन निर्मिती करत आहेत. वाघळवाडी येथील युवक अजय तात्याबा सावंत याने राज्यातील ऑक्सिजनची गरज ओळखून स्वतःचा ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या २० दिवसात उभा केला आहे. त्याच्या या प्रकल्पातुन बाहेर पडणाऱ्या ऑक्सिजन चा रोज १२०० रुग्णांना फायदा होत आहे.
अजय सावंत यांनी सोमेश्वर रिपोर्टर टीम शी बोलताना सांगितले, मी गेल्या दोन वर्षापासून फेब्रिकेशन आणि इंजिनीयरिंग जॉब ची कामे करत होतो, यावेळी बऱ्याच वेळा ऑक्सिजन तुटवडा जाणवत होता. यासाठी काय करावे लागेल याचा अभ्यास केला नंतर सहा महिने बेंगलोर आणि तीन महिने नाशिक येथे ऑक्सिजन प्रकल्पात प्रत्येक्ष जाऊन अनुभव घेतला. हे करत असताना अशा प्रकारचा प्रकल्प आपण देखील उभा करू शकतो असा विचार मनात आला. मात्र गरज होती ते भांडवलाची ..प्रकल्पाची किंमत ७ ते ८ कोटींवर जाणार होती. एवढ पैसे कोठून आणनार हा मोठा प्रश्न होता. त्यासाठी औरंगाबाद येथील एक मित्र
अशोक करडे या मित्राला भागीदारीत घेतले. त्याला देखील प्रकल्पाची संकल्पना आवडली. सारस्वत बँकेने कर्ज देखील मंजूर केले. उर्वरित कर्ज स्वभांडवलातून उभे केले आणि अवघ्या २० दिवसातच रांजणगाव याठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभा केला. वास्तविक हा प्रकल्प उभारण्यास अडीच ते तीन महिने कालावधी लागतो. मात्र ऑक्सिजन ची गरज ओळखून रात्रंदिवस काम करुन आम्ही अवघ्या २० दिवसात हा प्रकल्प सुरू केला.
समाजाच आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतुन आज हा प्रकल्प दिवसाला १२०० कोविड रुग्णांचा आधार बनला आहे. रोज कंपनीतून बाहेर पडणारे ६०० ऑक्सिजन सिलेंडर पुणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी दिले जातात.
COMMENTS