सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फरफट थांबवण्यासाठी तसेच सभासदांच्या आग्रहास्तव किसनवीरची निवडणूक लढवणार पण त्यासाठी लागणारे भाग भांडवल ऊभे करण्यासाठी पाचही तालुक्यातील सभासदांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी ऊपस्थित सभासदांच्या मेळाव्यात बोलताना केले .
सुस्थितीत चालेल कारखाना बंद पाडून समाजात नाक वर करून चालणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही. आज चोपन्न हजार शेतकरी सभासदांचे व कामगारांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तुमचे पाप राक्षसा एवढे मोठे झाले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुद्दामहून किसन वीर साखर कारखान्याचा विषय काढायला लावला. वस्तुस्थिती लपून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे काम विरोधक करत आहेत. आघाडी सरकार मदत देत नाही म्हणून ओरडण्यापेक्षा आघाडी सरकारने मागील वर्षी दिलेले हमीभावाचे बावीस कोटी थकीत ठेवले ते सांगा. किसनवीर आबांचे नाव व चोपन्न हजार शेतकऱ्यांचे संसार वाचवण्यासाठी या कारखान्याची निवडणूक समविचारी लोकांना एकत्र करून लढणार आहे, असा एल्गार आमदार मकरंद आबा पाटील यांनी केला.
भुईंज ता वाई येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसंदरभात येथील धनश्री मंगल कार्यालयात पाच तालुक्यातील शेतकरी सभासदांचा मेळावा पार पडला. आमदार पाटील म्हणाले, पाच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिवनाशी निगडित असणारा हा कारखान्याचा आहे. किसनवीर आबांनी अत्यंत खडतर परिस्थितीत कारखाना उभारला व त्याची वाटचाल सुरु ठेवली. १२५० मेट्रिक टनाचा कारखाना सुरु केला. धोम धरण सुर झाले. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले त्यामुळे तात्याच्या काळात चार हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेपर्यत विस्तार करण्यात आला. अवघ्या साडेसहा कोटींचे चालू कर्ज व ७ लाख ३० हजार साखरेची पोती शिल्लक असलेला कारखाना शेवटचा ५० रुपयांचा हप्ता देता न आल्याने तुम्ही कारखाना विरोधकांच्या ताब्यात दिला. शेतकरी संघटना आंदोलने करत होती. त्यावेळी तात्यांनी एकाकी लढत दिली परंतू अपयश आले. मात्र आज ९५० कोटींचा कर्जांचा बोजा, मागील हंगामातील ऊसांचे बिले मिळाली नाहीत. कामगारांचे २२ महिन्याचे पगार दिले नाहीत. बँकांनी जप्ती आणली आहे. कुठलीही बँक आज कारखान्यास कर्जे देऊ शकत नाही. अशी भयानक परिस्थिती असताना शेतकरी संघटना व सभासद शांत आहेत. कोणीही आंदोलन केले नाही. आम्ही जीव तोडून सांगत होतो. त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली होती. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खोडसाळपणे प्रश्न विचारण्यास भाग पाडले. राज्य सरकार मदत करीत नाही असा कांगावा विरोधक करीत आहेत. मागील हंगामातच कारखाना बंद पडला असता परंतू आघाडी सरकारने ३३ कोटी थकहमी दिल्याने कारखाना उशीरा सुरु झाला. त्यावेळी आम्ही मनात आनले असते तर एक छदामही कारखान्याला मिळू दिला नसता. थकहमीचे २२ कोटी शासनास परत न केल्याने कारखाना बंद पडला आहे. सातारा जिल्हाच्या राजकारणाचे वैभव म्हणून ओळख जाणारा व किसनवीर आबांचे नाव असलेला हा कारखाना काही झालेतरी वाचला पाहिजे. तुम्ही साध दिली तर शंभर टक्के निवडणूक लढवून यशस्वी होऊ. अवधी कमी असल्याने महत्वाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरून ठेवावेत. जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून अंतिम निवड करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
नितीन पाटील यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीचा सखोल आढावा घेऊन कारखान्याची निवडणूक लढणे व जिंकणे सोपे आहे. परंतू तो चालविणे कठीण आहे. विद्मान संचालक मंडळाच्या आर्थिक घोटाळ्यामुळे व चुकीच्या व्यवस्थापनामुळे कारखाना १३५ कोटीं तोटयात असून त्यातच प्रतापगड कारखाना चालविण्यास घेतला. आणि खंडाळा कारखान्याची उभारणी केली त्यामुळे हजार कोटींचा कर्जांचा बोजा झाला आहे. दरवर्षी ५५ कोटी रुपये व्याजाचा बोजा वाढत आहे. मालमत्ता केवळ ७५० कोटींची आहे. त्यावर बँकेने जप्तीच्या नोटीसा बजाविल्या आहेत. यापूर्वी हीच परिस्थिती होती त्यामुळे निवडणूक लढविली नाही. कारखाना कसा सुरु करायचा हाच खरा प्रश्न आहे. नवीन कारखाना उभारायचा म्हटले तर नियमानुसार २५ किमी क्षेत्राच्या अटीमुळे ते शक्य नाही. हा कारखाना वाचविण्यासाठी शंभर ते दिडशे कोटी भागभांडवल उभे करावे लागेल. त्यासाठी सभासदांनी योगदान दिले तरच कारखाना सुरु होऊ शकतो असे स्पष्ट केले.
यावेळी सदाशिव सपकाळ, नितीन भरगुडे पाटील, वसंतराव मानकुंबरे, प्रताप पवार, बाळासाहेब सोळसकर, शशिकांत पिसाळ अजय भोसले, अँड.सचिन गायकवाड, बाजीराव महांगडे, अशोकराव पवार, अजय वांगडे, अतुल जाधव, राजेंद्र गाढवे य़ांनी मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र पुजारी यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुंबरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव पवार, बकाजीराव पाटील, बाळासाहेब सोळसकर, उदय कबुले, नितीन भरगुडे पाटील, शामराव गाढवे, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, मनीषा गाढवे, चंद्रकांत ढमाळ, मनोज पवार, एस.वाय. पवार, डॉ.नितीन सावंत, तानाजी शिर्के, अमित कदम, रामभाऊ लेंभे, वामनराव जमदाडे व यावेळी वाई, खंडाळा. जावळी, कोरेगाव, सातारा या पाच तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी सभासद उपस्थित होते.
COMMENTS