सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : प्रतिनिधी धनंजय गोरे
सातारा महाबळेश्वर रोड लगतच असलेल नांदगणे पुनवडी नदीवरील पुलाचा नांदगणेचे बाजूस भराव निघून गेला आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी सोमेश्वर रिपोर्टरने ही बातमी प्रकाशीत केल्यानंतर प्रशासनाला जाग येत याठिकाणी फलक लावत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
पुनवडी पुलावरून प्रवास करणे आता धोकादायक झाले असलेने जिल्हा परिषद सातारा तसेच महसूल विभाग जावली यांच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या पुलावर धोक्याचे फलक लावून बोंडारवाडी भुतेघर, बाहुळे, तळोशी, वाळंजवडी, केडंबे, पुनवडी येथील नागरीकांना केळघर किंवा मेढा या प्रमुख बाजारपेठेत,दवाखान्यात, व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी डांगरेघर ते आंबेघर मार्गे वाहतुकीचा चा मार्ग बदलण्यात आला.
केळघर सजाचे तलाठी संदीप ढाकणे, ग्रामसेवक शिवाजी निर्मल, पंचायत समिती बांधकाम विभागाचे राजेंद्र देशमुख, पोलीस पाटील विष्णू दळवी, संदिप कासुर्डे, समाजसेवक दत्ता बेलोशे यांनी या पुलावरून प्रवास करत असणारे काही युवा,शालेय विद्यार्थी तसेच मोटार सायकल स्वार यांना सुरक्षेच्या दृष्टीने सुचना देत त्यांना डांगरेघर आंबेघर मार्गे जाण्यास सांगितले.
केळघर परिसरात गेले चार ते पाच दिवस मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असुन वेण्णा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे,परिसरातील ओढ्या नाल्यांना पुराचे स्वरूप आले आहे यामध्ये प्रामुख्याने शाळकरी विद्यार्थी,प्रवाशांसह फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.