सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
फलटण : प्रतिनिधी
निरा-देवघरच्या पाण्याचा हायड्रॉलॉजिकल डेटा बदलून बारामतीकरांनी पाणी पळवले असल्याचा आरोप केंद्रीय जलसंपदा मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे, दरम्यान दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळू नये म्हणून महाविकास आघाडीने फक्त बारामती साठीच काम केले, व इतर स्तरावर पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सांगत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पुन्हा पाणी मिळेल असा विश्वास ही व्यक्त करीत नीरा देवधर व कृष्णा भीमा स्थिरीकरण साठी लवकरच दिल्ली येथे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बैठक घेऊ असे सांगितले.
तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीवरून आज सोमवारी ना.शेखावत हे नीरा देवधर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाची हवाई पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ना. शेखावत बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कृष्णा पाणी तंटा लवादमधील नियमानुसार एका खोऱ्यातले पाणी दुसऱ्या खोऱ्यात आणता येत नाही. त्यामुळे कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना रखडली. पण, कृष्णा पाणी तंटा लवादमधील पाणी वाटपाची फेररचना करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. ही फेररचना करण्यासाठी ब्रिजेशकुमार आयोगाचा अहवाल महत्वाचा ठरणार आहे, लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा यांच्यात सध्या कृष्णा नदीच्या पाण्यावरुन वाद सुरु आहेत. या वादात तेलंगणा राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. पण, हा प्रश्न निकाली निघेल, असा प्रयत्न आम्ही करत आहोत.
राज्यातील ९४ तालुक्यांपैकी ५६ तालूके कृष्णा खोऱ्यात व पश्चिम महाराष्ट्रात येतात. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील ५६ तालुक्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राजस्थानसारख्या ज्या राज्यातून आम्ही येतो तिथेही पाणी टंचाईचा प्रश्न गहन आहे. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेबद्दल आपण सकारात्मक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा मंत्री ना. शेखावत यांनी केले.
निरा देवघर सिंचन प्रकल्प हा राज्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार एकत्रितरित्या प्रयत्न करेल व सकारात्मक पाऊल उचलेल. निरा देवघर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आम्ही यापूर्वीही प्रयत्न केले होते. केंद्रीय जलसंपदा मंत्री या नात्याने दोन वेळा आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, पूर्वीच्या सरकारने याबाबत वेळकाढूपणाची भूमिका घेतली. अन्यथा, हा प्रकल्प पूर्वीच पूर्ण झाला असता. पण, निरा-देवघरच्या पाण्याचा हायड्रॉलॉजिकल डेटा बदलून बारामतीकरांना पाणी पळवायचे होते, असे ना. शेखावत यांनी स्पष्ट केले.
खासदार रणजितसिंह म्हणाले, आपण केलेल्या विनंतीनुसार प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतल्यानंतर माढा करमाळ्यासह संपूर्ण दुष्काळी पट्ट्याला कृष्णेच्या पाण्याचा लाभ होईल, अशी आशा ना. शेखावत यांच्या दौऱ्याने दिसत आहे. दरम्यान, सोमवार (दि. १३) रोजी निरा देवघर सिंचन प्रकल्पाच्या वाघोशीपर्यंत झालेल्या कालव्याच्या कामाची पाहणी, तद्नंतर प्रस्तावित लाभक्षेत्राची पाहणी, उद्धट व तावशी येथील निरा भीमा स्थिरीकरणाच्या कामाची पाहणी याबाबत केंद्रीय जलसंपदा मंत्री ना. गजेंद्र शेखावत यांनी माहिती घेतली असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.यावेळी विश्वासराव भोसले,अभिजित नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे,अशोकराव जाधव,शिराजभाई शेख,अमोल सस्ते,बाजीराव काटकर,बाळासाहेब कदम,राजाभाऊ नागटिळे,विक्रांत झणझणे,सुनील जाधव,संजय गायकवाड,नितीन जगताप उपस्थित होते.