सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबूत येथील शेतकरी संभाजीराव काकडे यांनी आपल्या शेतात आल्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. पहिल्या वर्षी आल्याचे पीक तोट्यात गेले असले तरी यावर्षी त्यांना आल्याला चांगला बाजार मिळाला आहे.
यावेळी त्यांना प्रति टन ६६ हजाराचा भाव मिळाला आहे. त्यामुळे आल्यापासून त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. निंबूत येथील संभाजीराव काकडे हे सोमेश्वर विद्यालयात नोकरीला होते.
२०२१ मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्या त्यानंतर त्यांनी आपल्या शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष द्यायला सुरुवात केली.
आपल्या शेतापैकी पावणे दोन एकर शेतात त्यांनी आल्याची लागवड केली. विशेष म्हणजे पपईच्या बागेत आंतरपीक म्हणून त्यांनी हे आल्याचे पीक घेतले आहे. पहिल्या वर्षी त्यांना टनाला केवळ दहा हजाराचा भाव मिळाला त्यामुळे पहिलं वर्ष त्यांना तोट्यात गेले.
मात्र तरी देखील त्यांनी हार न मानता पुन्हा पावणे दोन एकर क्षेत्रात आल्याची पुन्हा लागवड केली.
यावर्षी मात्र त्यांना आल्याने आणि त्याला मिळणाऱ्या बाजारभावाने चांगली साथ दिली.
यावर्षी त्यांना जागेवरच ६६००० रुपये प्रति टन भाव मिळाला आहे. त्यामुळे त्यांना यावर्षी आल्याच्या शेतातून फायदा झाला आहे. आले हे पीक तसं सातारा, कोरेगाव, सांगली या भागात घेतलं जात.
पुणे जिल्ह्यात पुरंदर, बारामती तालुक्यात आल्याचे पीक फारसे घेतले जात नाही. परंतु काकडे यांनी प्रयोग म्हणून हे पीक घेतले त्यांना एकूण सहा लक्ष १२ हजार रुपये चे खर्च आला. त्यांना पावणेदोन एकरात २७ टन उत्पादन मिळाले. म्हणजे त्यांना १७ लाख ८२ हजाराचे उत्पादन मिळाले. यातून खर्च वजा केले तर ११ लाख ६५ हजार रुपयांचे उत्पादन त्यांना मिळाले आहे.
त्यामुळे उसाच्या मागे धावण्यापेक्षा आल्याचे उत्पादन घेण्यात त्यांना यश आले आहे. यावर्षी मला आल्याचे चांगले उत्पादन मिळाले. मात्र मागील वर्षी एकरी तीन लाख रुपये तोटा झाला होता मागील तोट्याने खचून न जाता पिक सातत्य ठेवल्यास फायदा झाला. आपल्या मातीत हे पीक व्यवस्थित येईल का नाही? याबाबत शंका होती. मात्र यावेळी चांगले पीक आले. त्याचबरोबर बाजारही चांगला मिळाला. यामुळे मागील तोटाही भरून काढण्यात आला. शेतमालाला सरकारने जर हमीभाव दिला.तर तरुण नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे लक्ष देतील आणि रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल.
काकडे यांनी साताऱ्यातील कोरेगाव मधून स्थानिक बियाणे आणून त्याची लागवड केली. सुरुवातीला शेणखत व बांधणीच्या वेळी कोंबखत यांचा भरपूर वापर केला.
सेंद्रिय खतांचा जास्त वापर केला. ड्रीपच्या माध्यमातून रासायनिक खतांचा वापरही केला. मात्र रासायनिक खतांचा वापर त्यांनी केवळ दहा टक्केच केला. पाठीमागील वर्षी रासायनिक खतांचा वापर ३० टक्के होता. आता पुढील वर्षी शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने घेणार असल्याचे काकडे म्हणाले.