सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात सरवडे (जि. कोल्हापूर) येथील आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९) या वारकऱ्याचा लोणंद येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला., सोमवार दि.१९ रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडली. व्हरकट हे आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत सहभागी झाले होते. वारीत ते ट्रकचालक म्हणून काम करत होते. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
व्हरकट हे गेली अनेक वर्षांपासून गावातून जाणाऱ्या आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारी दिंडीत सहभागी असायचे. यावर्षी देखील ते दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीत ट्रक चालवण्याची सेवा करीत होते. आज लोणंद येथे पहाटे उठल्यानंतर प्रार्थविधीसाठी जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून चालले होते. त्याचवेळी रेल्वे आल्याने ते रेल्वेला धडकले अन् त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात झाली आहे. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
आळंदी ते पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळा रविवारी लोणंद येथे विसावला. येथे दोन दिवस मुक्कामानंतर हा सोहळा मंगळवारी फलटण तालुक्यातील तरडगावला दुपारी मार्गस्थ होत आहे. लोणंद येथे वारकऱ्यांसाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. तसे प्रशासनाने चोख व्यवस्था ही केली आहे. मात्र, आज दुर्दैवाने ही घटना घडली आणि वारकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. जेजुरी ते वाल्हे दरम्यान दिंडीतील वाहनाची ठोकर बसून एका वारकरी महिलेलाही जीव गमवावा लागला होता. दिंडीदरम्यान वारकऱ्यांनी रस्त्यावरून जाताना तसेच कालवा, विहिरी आदी ठिकाणी आंघोळीसाठी व इतर कामासाठी जात असताना काळजी घ्यावी, असे आवाहन दिंडीचालक, मालकांनी केले आहे.
COMMENTS