सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : महेश जगताप
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याकडे नोंदविलेला ऊस बाहेरील कारखान्यास घालणाऱ्या सभासदांच्या सर्व सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ऊस तोडीसाठी शेतकऱ्याकडून पैसे घेतल्यास ऊसतोडणी कामगाराच्या बिलातून ते पैसे वसूल केले जातील. त्यामुळे ऊस तोडीसाठी कोणीही पैसे देऊ नयेत. शेतकऱ्यांची सहमती नसताना ऊस जळीत केल्यास कारखान्याकडे लेखी तक्रार करावी. बिगर सहमती शिवाय सभासदांचा ऊस जळीत केल्यास व तसे आढळल्यास ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेच्या ऊसवाहतूक बिलातून सदरील जळीताची रक्कम वसूल करून सबंधीतास देण्यात येईल असे मत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
याबाबत जगताप यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे, त्यात म्हणटले आहे की, राज्यसरकारने यावर्षी १५ नोव्हेंबरला राज्यातील सर्व कारखान्यांना गाळप करण्यास परवानगी दिल्यामुळे १५ दिवस सोमेश्वर कारखाना उशिरा चालु झाला. असे असतांनाही सोमेश्वरकडे नोंदवलेल्या संपुर्ण ऊसाचे गाळप २० मार्च ते २५ मार्च पर्यंत संपवणार असून नोंदवलेल्या संपुर्ण ऊसाचे गाळप करण्यास संचालक मंडळ कटिबध्द आहे. सभासद शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. जगताप पुढे म्हणाले की, सोमेश्वरकडे इतर कारखान्यांच्या तुलनेने समाधानकारक उसाचे क्षेत्र आहे. तसेच बाजूच्या अनेक कारखान्यांची गाळप क्षमता वाढल्याने त्यांना उसाची कमतरता भासू लागल्याने व ऊस लवकर नेण्याचे प्रलोभन दाखवून अनेक सभासदांना ऊस बाहेर घालण्यास बळी पाडले आहे. अशा तातपुरत्या प्रलोभनाला बळी न पडता स्वतःचे आर्थिक नुकसान करून कारखान्याकडे नोंदलेला ऊस बाहेर देऊन कारखान्याबरोबर केलेल्या ऊस नोंद कराराचा भंग करून ऊस इतर कारखान्यांना देण्याची चूक करू नये असेही जगताप यांनी म्हटले आहे. सभासदांनी इतर कारखान्यांना ऊस घालून संचालक मंडळास नाईलाजास्तव कारवाई करण्याची वेळ आणू नये. संपूर्ण गाळप वेळेत पुर्ण होत असताना नोंदीचा संपुर्ण ऊस सोमेश्वरलाच देऊन सहकार्य करावे. जेवढे जास्त गाळप तेवढा उत्पादन खर्च कमी व यामुळे सभासदांना जास्तीचा मोबदला देणे शक्य होईल. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वाढलेल्या ऊस क्षेत्राचा विचार करता सोमेश्वरने गाळप क्षमता वाढवली आहे. कारखान्याने पुर्व हंगामी, सुरू व खोडवा या ऊसास अनुदानही दिलेले असताना बाहेरील कारखान्यांना ऊस घालून सभासदांनी आपले नुकसान करून घेऊ नये. सोमेश्वरने ९३ दिवसांमध्ये ८ लाख ६१ हजार मे. टन ऊसाचे गाळप केले असून यामधून सरासरी ११.५१ टक्के साखर उतारा राखत ९ लाख ८८ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. दैनंदिन साखर गाळप क्षमता ७५०० मे.टन प्रति दिन असतांनाही ९२६२ मे. टनाच्या उच्चांकी सरासरीने गाळप केले जात आहे. को-जन प्रकल्पामधून ६,१४,३४,१३५ युनिट्सची वीजनिर्मिती केली असून ३,५७,५९,८९२ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पातून ४२,६०,४०३ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून सोबत २३,१७,७२० लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतलेले आहे. कारखाना जवळपास १५० दिवस पुर्ण क्षमतेने चालला तर त्याच्या कार्यक्षमतेचा पुर्ण वापर होतो. जास्त गाळप केल्यास जास्त साखर उत्पादन, जास्त वीज निर्मिती व विक्री, अधिकचे अल्कोहोल उत्पादन यामुळे सभासदांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखता येईल असे जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हणटले आहे.