सुपे परगणा l महाज्योतीच्या निधीबाबत सरकारकडुन दुजाभाव : कल्याण दळे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
महाराष्ट्रात ओबीसींच्या ४५० पेक्षा जास्त जाती असताना सारथी, बार्टी या संस्थांपेक्षा महाज्योतीच्या निधी बाबत सरकारकडुन दुजाभाव केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी केला आहे. 
      सुपे येथे नाभिक समाजाचा पुर्व विभागिय  जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन दळे बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पुर्व विभागिय अध्यक्षपद सुयश जाधव यांना देण्यात आले. तसेच जिल्हा आणि तालुक्यातील अनिकेत जाधव, संदिप जाधव, सुरज जाधव, अजित जाधव, चंद्रकांत जाधव, मनोज जाधव आदींची विविध पदांवर निवडी करुन दळे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. 
            राज्यात ४५० पेक्षा जास्त जाती ओबीसीत आहे. त्यात सरकारकडुन ५७ लाख कुणबी दाखले दिले गेले आहेत. ओबीसींना २७ टक्के आरक्षण असताना प्रत्यक्षात १९ टक्केच आरक्षण मिळत आहे. महाज्योती संस्था ही  ओबीसींकरीता काम करते. त्यामध्ये ओबीसींच्या ४२५ जाती आहेत. मात्र सरकार सारथी, बार्टी या संस्थांपेक्षा महाज्योतीला अपुरा निधी देत आहे. तसेच त्यातही सरकार त्यातील काही निधी इतरत्र वळवित असल्याचे त्यांनी सांगितले.
         सरकार आण्णांसाहेब पाटील महामंडळाला १ हजार ६५ कोटी तर ओबीसी इतर महामंडळाला ५ कोटीचा निधी हा दुजाभाव सरकार करीत असल्याची टीका दळे यांनी यावेळी केली. ओबीसीचे इतर मागासवर्गीय महामंडळ आहेत त्याचे १८ उपमहामंडळे सरकारने केली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यत निधी पोहचण्यासाठी शासनाने लवकरात लवकर रोहीणी आयोगाची स्थापना केली पाहीजे असे दळे यांनी सांगितले. तसेच स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या जिवबा महालेंचे स्मारक तसेच हुतात्मा भाई कोतवाल यांचे स्मारक सरकार बांधणार असे बोलतायेत. मात्र अद्याप त्यास निधी मिळत नसल्याची खंत दळे यांनी व्यक्त केली.  
         याप्रसंगी येथील सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच शंकर शेंडगे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश राऊत, जालण्याचे अध्यक्ष बळीराम वैद्य, किशोर मुळे, जिल्हाध्यक्ष अशोक मगर, महिलाध्यक्षा मंगल आढाव, माजी नगरसेवक मोहन शिंदे यांच्यासह आंबेगाव, खेड, शिरुर, दौंड, इंदापुर, बारामती, पुरंधर, भोर, वेल्हा, मावळ आणि मुळशी आदी तालुक्यातील अध्यक्ष व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. येथील कार्यक्रम यशस्वी करण्याकामी सुपे नाभिक संघटनेचे सहकार्य मिळाले.
        यावेळी रमेश राऊत, अशोक मगर, मंगल आढाव, सचिन राऊत, संजय जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिपक जाधव यांनी केले. सुत्रसंचालन चंद्रकांत जाधव यांनी केले. उपस्थितांचे स्वागत भालचंद्र जाधव यांनी केले. तर आभार महेश जाधव यांनी मानले. 
         .......................................
To Top