दिलासादायक... पुरंदर बोपगावच्या रुग्णाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह.
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथे मागील आठवड्यात मुंबई येथून आलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीच्या संपर्कात तालुक्यातील व घरातील लोकांचा संपर्क आला होता. या वृद्ध व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील (हाय रिस्क संपर्कातील) सर्व व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुरंदरचे प्रशासन पुन्हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यशस्वी झाले आहे.
पुरंदर तालुका प्रशासनाने कोरोनाच्या काळात मोठी सतर्क आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास तात्काळ उपाययोजना करत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना कोरंटाईन करत, 'ट्रिपल सी' सासवड येथील केंद्रामध्ये दाखल करण्यात येते, त्यांची तपासणी केली जाते. वेळच्यावेळी सतर्कता घेतल्यामुळे पुरंदर मध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रशासनाला यापूर्वीही आणि आजही यश आल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाच्या या यशस्वी वाटचालीने तालुक्यांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. पुरंदरचे प्रशासन ज्या पद्धतीने धडक कारवाई करत आहे त्यामुळे पुरंदर तालुक्यात कोरोना संसर्ग वाढण्यास मज्जाव होत आहे. त्यामुळे मुंबई पुण्याहून आलेल्या व्यक्ती किंवा इतरत्र कामानिमित्त गेलेल्या व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे पुरंदरचे प्रशासन कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यशस्वी झाला आहे असे आज रोजी तरी अधोरेखित होत आहे.
सध्या अनलॉक सुरु आहे, यामध्ये राज्य शासनाने जनजीवन हळूहळू सुरू करण्यासाठी वेगवेगळे उपाय व सतर्कता बाळगत जनजीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण लोकांनी कोरोना गेल्याच्या आवेशात तालुक्यामध्ये व इतरत्र भटकण्याचा सपाटा चालवला आहे. मात्र ही धोक्याची घंटा आहे. हे ओळखून लोकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे पुरंदरच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. तरीही सध्या शेतीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे शेतकरी बांधव सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरा, वाघापूर व इतर मोठ्या गावांमध्ये बाजार हाटासाठी व बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत.
या लोकांनी शक्यतो कमीत कमी वेळेत बाजारातून आपल्या घरी जावे, तसेच बाजारामध्ये ही सोशल डिस्टंसिंग तंतोतंत पालन करावे आणि सॅनिटायजरचा वेळच्या वेळी वापर करावा, घरी गेल्यावर संपूर्ण कपड्यानिशी आंघोळ करावी व बाजारात वापरलेले कपडे पूर्ण धुऊन घ्येत उन्हामध्ये वाढवावे असे आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे.
COMMENTS