नीरेत आयटीआय व सिनियर कॉलेज सुरू करावे ; भैय्यासाहेब खाटपे
पुरंदर: प्रतिनिधी
नीरा येथील रयत शिक्षण संस्थेत मंजूर असलेले आयटीआय तातडीने सुरू करावे व त्याच बरोबर सिनियर कॉलेजही सुरू करावे अशी मागणी नीरेतील सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब खाटपे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना नुकतेच दिल्याची माहिती खाटपे यांनी दिली आहे.
नीरा हे गाव जवळपास १७ हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावाच्या आसपास वीस गावातून विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी नीरेत येतात. नीरा येथील रयत संकुलातील दोन माध्यमिक शाळा व दोन ज्युनियर कॉलेज मध्ये जवळपास दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी जवळपास सोय नसल्याने तालुक्या बाहेरील महाविद्यालयात जावे लागते. यासाठी शेकडो विद्यार्थ्यांना दररोज बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा दोन्हींचा अपव्यय होतो. त्याच बरोबर अनेक मुली सिनियर कॉलेज जवळ नसल्याने बारावीनंतरचे शिक्षण सोडून देतात.
त्यामुळे नीरा येथील रयत संकुलात सिनियर कॉलेज सुरू करावे. त्याच बरोबर निरेच्या जवळपास कोठेही तंत्र शिक्षणासाठी आयटीआय नाही. पुरंदर तालुक्यात दोन आयटीआय आहे, ते तोही पुरंदरच्या दुसऱ्या टोकाला दिवे व वाघापूर येथे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज ४५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यातच तिथे प्रशिक्षणार्थींना कमी जागा उपलब्ध असल्याने अनेकांना तंत्र शिक्षणापासून वंचित राहावे लागते. वाघापूरच्या तंत्रनिकेतन मध्ये काही मोजकेच तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम आहे. तेथील व्यवस्थापनाचा कोणताच अंकूश या संस्थेवर नाही. सध्या कुशल कामगारांचा तुटवडा असल्याने तरुणांना आपल्या भागातच तंत्र शिक्षण मिळाले तर या भागातून अनेक कुशल कामगार तयार होऊ शकतात व तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मिटू शकतो. जेजुरी सारखे औद्योगिक केंद्र असतानादेखील केवळ तंत्रशिक्षण नसल्याने या भागातील तरुणांना तिथे नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे परराज्यातील अनेक कामगार तिथे काम करताना दिसतात तेच शिक्षण जर आपल्या तरुणांना स्थानिक पातळीवर मिळाले तर त्यांना जेजुरी एमआयडीसी सारख्या भागात नोकरी मिळू शकते. म्हणून नीरा येथील रयत शिक्षण संकुलात मंजूर असलेले आयटीआय सुरू करावे येथील तरुणांना तंत्रशिक्षण मिळावे अशी मागणी भैय्यासाहेब खाटपे यांनी केली आहे.
COMMENTS