पुरंदरच्या वाघापूर मध्ये गायरानात अतिक्रमण करण्याची चढाओढ
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरानात अतिक्रमण करून बांबू, पत्रे, विटा असे साहित्य लावून आपापल्या जागा आरक्षित करण्यासाठी काल चढाओढ लागली.
वाघापूर येथील एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने पत्नीच्या नावाने गायरानात अतिक्रमण करून जागा आरक्षित केली. हे पाहिल्यानंतर बाकीच्या लोकांची या परिसरात जागा आरक्षित करण्यासाठी चढाओढ लागली. मात्र, रविवार सुटीचा दिवस असताना देखील ग्रामसेविका विजया भगत यांनी गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांना सांगून प्रशासनाच्या माध्यमातून येथील अतिक्रमणे दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका अतिक्रमणावर विद्युत तारा असल्यामुळे ते राहिले. मात्र, ज्यांची अतिक्रमणे काढली होती, त्याने त्याचे कारण दाखवून आज पुन्हा आपल्या जागा आरक्षित केल्या.
सहा महिन्याच्या आतील अतिक्रमण काढण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून गेल्या दोन दिवसांत झालेली अतिक्रमणे ग्रामपंचायतीने दूर करण्याचा प्रयत्न केला. पण, ग्रामस्थांचे एकमेकांविरुद्धचे हेवेदावे पुढे आले. त्यांचे अतिक्रमण काढले नाही म्हणून आम्ही जागा आरक्षित करत आहोत. त्यांचे अतिक्रमण काढा, मग आम्ही काढतो, असा सूर पुढे आला.
दरम्यान, उद्या पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे काढली जातील, असे ग्रामसेविका विजया भगत यांनी सांगितले. या वेळी पोलीस पाटील विजय कुंजीर, सरपंच छाया वाघमारे, उपसरपंच प्रवीण कुंजीर, सदस्य अंजली कुंजीर, सुनील कुंजीर, अशोक कुंजीर, सारिका कुंजीर, स्वाती गाडेकर, विशाल दिक्षीत, शोभा कुंजीर आदी उपस्थित होते.
कोणीही शासकीय जमिनीवर अगर जागेवर कच्चे अगर पक्के स्वरूपाचे बांधकाम अनधिकृतपणे करू नये. त्यामध्ये आपले स्वतःचेच मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, असे पुरंदरचे माजी सभापती व विद्यमान सदस्य रमेश जाधव यांनी सांगितले.
COMMENTS