श्री क्षेत्र भुलेश्वरची श्रावण यात्रा रद्द : कावड ,पालखी सोहळा बंद
पुरंदर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील भगवान शंकराचे एक जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यामध्ये शिल्प कला व सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणा-या श्री क्षेत्र भुलेश्वर येथील श्रावण यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आल्याची माहीती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.
श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथील यात्रा सोमवर २१ जुलै पासून सुरू होत असून सध्या असणा-या कोरोना विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर भुलेश्वर मंदिर येथील सुरक्षा व यात्रा नियोजन या विषयावर चर्चा करण्यासाठी भुलेश्वर मंदिरामध्ये श्रावण यात्रा नियोजन बैठक पार पडली .
या बैठकित दरवर्षी कावड मिरवणुक, पालखी मिरवणुक, पाण्याच्या कुंडापाशी देवास आंघोळ घालणे व यात्रे निमीत्त विविध कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे मंदिर बंद असताना अनेक लोक येतात. मंदिर परिसरात वावरतात यावरही बंदी घालत बंदोबस्त करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवसाचे दंडवट घालणे, नैव्यद्य दाखवणे हेही बंद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विनाकारण या ठिकाणी येणा-या लोकांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यात्रा काळात श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी पुरातत्व विभाग, वन विभाग यांची मदत घेण्यात येणार असल्याचे माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनी सांगीतले.
यावेळी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने, पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिलिंद टोनपे, वन परिक्षेत्र अधिकारी जयश्री जाधव, माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके, भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव, ग्रामसेविका सोनाली पवार, राजेवाडी मंडल अधिकारी भारत भिसे, गावकामगार तलाठी सतिश काशीद, पुरातत्व विभागाचे राहुल बनसोडे, भुलेश्वर देवस्थानचे सर्व पुजारी, मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
रुपाली सरनोबत
तहसीलदार पुरंदर
'दरवर्षी प्रमाणे कोणतेही धार्मिक विधी होणार नाहीत. फक्त पुजारी येऊन मंदिरात नित्य पूजा करतील तर या यात्रा काळात जर कोणी या ठिकाणी आले तर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल. सध्या असणा-या कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या प्रत्येकाने नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
COMMENTS