अक्षय शिंदे फाउंडेशन च्या वतीने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा आणि टॅबचा वापर फक्त ऑनलाईन शिक्षणासाठीच करावा यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांना सहकार्य करावे. मोबाईचा गैरवापर होत असल्याने समाजात गैरसमज वाढत आहेत त्यामुळे मोबाईलचा मर्यादित वापर करत शिक्षण घ्यावे असे आवाहन बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.
सोमेश्वरनगर येथील अक्षय शिंदे फाऊंडेशनच्या वतीने निंबुत(ता. बारामती) येथील बाबालाल साहेबराव काकडे -देशमुख विद्यालयाला ऑनलाईन शिक्षणासाठी ८० तसेच ज्युबलियंट कंपनीच्या वतीने ४१ टॅबचे प्रातिनिधिक स्वरुपात बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर आणि ज्युबलियंटचे उपाध्यक्ष सतिश भट्ट यांच्या हस्ते बुधवार(दि.१९) रोजी वाटप करण्यात आले त्यावेळी शिरगावकर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश काकडे होते. यावेळी फाऊंडेशनच्या वतीने कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर आणि वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामानिमित्त पुरस्कार देवून गौरवण्यात आले. तसेच वडगाव निंबाळकरचे पोलिस कर्मचारी महेंद्र फणसे, गौतम लोकरे, तायडे, पोलिस मित्र स्वप्नील काकडे यांचाही गौरव करण्यात आला.
शिरगावकर पुढे म्हणाले की, अक्षय शिंदे फाऊंडेशनच्या वतीने नेहमीच गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत आणि समाजहिताचे काम केले जात आहे. टॅबमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मदत मिळाली असून त्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. पोलिसांच्या बाबतीत समाजात गैरसमज असून त्यांना कामाचा ताण आहे. दिवस कसा घालवायचा हे आम्ही ठरवू शकत नाही, वेळेवर जेवण, झोप होत नसल्याने आमचे आजार वाढत आहेत त्यामुळे पोलिसांकडे बदलण्याचा दृष्टीकोण बदलण्याची गरज आहे. कोरोनाचा रुग्ण सापडला की दहशतवादी सापडल्यासारखे लोक वागत आहेत असेही शिरगावकर म्हणाले.
यावेळी अक्षय शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष आर. एन. शिंदे, मुगटराव काकडे- देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, तिरुपती बालाजी ॲग्रो कंपनीचे संचालक संजय शिंदे, ज्युबलियंट लाईफ सायन्स कंपनीचे उपाध्यक्ष सतिश भट्ट, अक्षय शिंदे फाऊंडेशनचे सदस्य संतोष शेंडकर, महेश जगताप, राजेंद्र बालगुडे, बा. सा. काकडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिपाली ननवरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. सोमप्रसाद केंजळे यांनी केले. सुत्रसंचालन बाबुलाल पडवळ यांनी आणि आभार योगेश सोळस्कर यांनी मानले.
COMMENTS