सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
बारामती तालुक्यात वाणेवाडी ते मळशी दरम्यान अडीच किलोमीटर चा रस्ता गेल्या दहा वर्षापासून रखडलेला आहे. अनेकवेळा मागणी करून देखील का रस्ता केला जात नाही. मात्र ज्या रस्त्याची गरज नाही आणि तिथून एक माणूस अथवा एक वाहन देखील जात नाही असा रस्ता बनवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चक्क १८ लाख रुपये टाकले आहेत. विशेष म्हणजे हा रस्ता फक्त ४०० मीटर होणार असून त्याचा कुणालाच उपयोग होणार नाही. त्यामुळे १८ लाखाचा निधी पाण्यातच गेल्याचे बोलले जात आहे.
वानेवाडी ते मळशी या ठिकाणाचा दिग्विजय जगताप यांच्या वस्तीपर्यंत सुमारे अडीच किलोमीटर चा रस्ता गेल्या दहा वर्षापासून राखलेला आहे. या रस्त्यावर रोज शेकडो लोक ये जा करत असतात मात्र एकदेखील लोकप्रतिनिधी या रस्ता करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसत आहे. या रस्त्यावरून गेली पाच वर्षापासून चारचाकी वाहन जाणे बंद झाले असून आता दुचाकी वाहनचालकांनी देखील या रस्त्यावरून जाणे बंद केले आहे. पाचशे लोकसंख्या असलेल्या वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या मळशीकरांचे सर्वच आर्थिक व्यहवार हे वाणेवाडी आणि सोमेश्वर कारखाना या ठिकाणी असतात तर शेकडोंच्या वर मुले प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी सोमेश्वर विद्यालयात येतात. तसेच अनेक शेतकरी, ट्रॅक्टर, तसेच उसाच्या बैलगाड्या या रस्त्यावर वाहतूक करतात, वाणेवाडी अथवा सोमेश्वर कारखाना ये जा करण्यासाठी हा सर्वात जवळचा रस्ता असल्याने सर्वच जण या रस्त्याचा वापर करतात. मात्र संबंधित विभाग या रस्त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे.
गेल्या ऊस हंगामात चार ते पाच उसाने भरलेल्या बैलगाड्या खराब रस्त्यामुळे चाके तुडून अपघात झाल्यानंतर सोमेश्वर कारखान्याने रस्त्याची थोडीफार डागडुजी केली होती.
खराब रस्त्यामुळे एकाने गमावला प्राण
गेल्या वर्षी मळशी येथील राजेंद्र तुळशीराम काकडे वाणेवाडी कडून मळशी या ठिकाणी घरी जाताना खराब रस्त्यावर गाडी घसरून झालेल्या अपघातात डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
COMMENTS