सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात आठवडाभरापासून थंडीत वाढ झाली असल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा करडई ,सूर्यफूल, हुलगा, पावटा ही पिके जोमात वाढू लागली आहेत.
तालुक्यात रब्बी पिकांची पेरणी झाल्यानंतर आठ ते दहा दिवस पाऊस नव्हता. मात्र पिकांची उगवण चांगली झाल्यानंतर दोन ते तीन दिवस जोराचा पाऊस झाल्याने पिकांची वाढ उत्कृष्ट झाली.मागील आठवड्यापूर्वी लागोपाठ चार ते पाच दिवस ढगाळ हवामान तयार होत होते.या ढगाळ हवामानामुळे रब्बीतील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती.मात्र दोन-तीन दिवसांनंतर वातावरण स्वच्छ झाल्याने पिकांवरील रोगराईचे संकट टळले आहे.जोमात आलेल्या रब्बी पिकांमुळे नेरे,आंबवडे,निगुडघर,वेळवंड, संगमनेर,पूर्व पट्ट्यातील सारोळा,भोगवली,किकवी परिसरातील शिवारे हिरवाईने नटली आहेत.सध्या थंडी वाढल्यामुळे रब्बीतील सर्वच पिकांना पोषक वातावरण असल्याने पिके तरारली आहेत. काही दिवस असेच वातावरण राहिले तर रब्बी पिकांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे खानापूर येथील प्रगतशील शेतकरी लता नांगरे यांनी सांगितले .
COMMENTS