सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गुळंचे (ता. पुरंदर) येथील अनेक नागरिकांना कुठलीही पूर्वकल्पना अथवा नोटीस न देता मतदार यादीतून ३३ नावे वगळण्याचा, तसेच नवीन ४७ मतदारांची नावेही वेळेत समाविष्ट न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामसभेने याप्रकरणी महसूलच्या कर्मचाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली असून वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे.
गुळुंचे गावच्या अंतिम मतदार यादीमध्ये बाहेरगावी राहणाऱ्या ग्रामस्थांची नावे वगळल्याचे तर ४७ नवमतदारांची नावेही समाविष्ट न
केल्याचे उजेडात आले.
याबाबत उपसरपंच संतोष निगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत शिवानी जुन्नरकर, मोहिनी " निगडे, आकाश भंडलकर यांनी नाव समाविष्ट झाले नसल्याची तर दशरथ निगडे, इंदुमती निगडे, उत्तम निगडे
आदींनी नावे परस्पर वगळली गेली असल्याची तक्रार केली. ग्रामसभेस तलाठीही उपस्थित नव्हते. ग्रामसभेने यावर मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करून घेण्याबाबतचा ठराव घेतला. उपसरपंचांनी सदर ठरावासह तक्रार अर्ज तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्याकडे दाखल केला. सोमेश्वर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे, संकेत निगडे यांनीही अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा उपोषण करू असे निवेदन तहसीलदारांना नुकतेच दिले.
कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्यांच्या नातेवाइकांनी नमुना सात भरून दिल्यावर नावे वगळतात. तत्पूर्वी संबंधित मतदारास पूर्वसूचना देणे अथवा मतदार न आढळल्यास दोन साक्षीदारांच्या सह्या घेणे, घराच्या •भिंतीवर नोटीस चिकटविणे ही प्रक्रिया करावी लागते.
बीएलओ अथवा तलाठ्यांचा अभिप्राय आवश्यक असतो. कुणी दोन गावात मतदार असेल तरीही बाजू मांडल्यावरच एक नाव वगळता येते. नमुना सातवर नातेवाईक अथवा साक्षीदारांच्या नव्हे तर कोतवालांच्या सह्या आहेत. एका अर्जावर सहीच नाही. त्यामुळे तलाठ्यांनी संगनमताने नावे वगळल्याचे दिसत आहे. तसेच नवीन नावे तक्रारी झाल्यावर घेतली, अशी तक्रार जितेंद्र निगडे, अभय निगडे, संभाजी कुंभार यांनी केली आहे. तलाठी गणेश महाजन म्हणाले, "मी नवीन नावे १० डिसेंबरलाच दाखल केली आहेत तर नावे वगळण्याचा अधिकार मला नाही."
-------------------
नवमतदारांना हक्क मिळणार-------
नायब तहसीलदार तथा मतदान नोंदणी अधिकारी उत्तम बडे यांनी नवीन मतदारांना पुरवणीद्वारे समाविष्ट करून घेत क्रमांकही दिला आहे. त्यानुसार त्यांना येत्या निवडणुकीतच मतदानाचा हक्क मिळेल. वगळलेल्या नावांबाबत व नियमात काम झाले की नाही याबाबत तहसीलदारांच्या पातळीवरून निर्णय होईल, अशी माहिती दिली.
COMMENTS