सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ 'अस्पृश्य उध्दारक' एवढ्याच ओळखीमध्ये जाणीवपूर्वक अडविले जात आहे. वास्तविक त्यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य केलेल आहे. संत व समाजसुधारकांच्या विचारांना त्यांनी कायद्याचे, संविधानाचे अधिष्ठान देऊन हजारो वर्षांची विषमता नष्ट करण्याचे मौलिक कार्य केले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे भारत देशाच्या राष्ट्रनिर्मितीमध्ये बाबासाहेबांचे महत्वपूर्ण योगदान आहे, असे मत भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेचे राज्य सचिव संतोष शेंडकर यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील शरदचंद्रजी पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य' या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देवकर, डॉ. प्रिया जगताप, पत्रकार महेश जगताप आदी उपस्थित होते. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत प्रिया कांबळे, सनी शिंदे, गौरव खोमणे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. तर मराठी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेत श्वेता जाधव, दिव्या सुर्वे, हिम्मत मुटेकर यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.
याप्रशंगी शेंडकर म्हणाले, महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. प्रबोधनकार, समाजसुधारक यांची महाराष्ट्र ही खाण आहे. मात्र या संत, समाजसुधारकांना सनातनी लोकांचा छळ सहन करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांना राजे असतानाही अशा गोष्टींना सामोरे जावे लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःलाही वाईट वागणूक मिळाली. उच्च विद्या विभूषित झाल्यावरही लोक जातीवरून छळ करत होते. त्यामुळे बाबासाहेबांनी मिळविलेल्या ज्ञानातून अर्थार्जन करण्यापेक्षा सामाजासाठी आयुष्य वेचण्याचा निर्धार केला. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि बहुजन, शूद्र व स्त्रियांना पशुवत समजणारी मनुस्मृती जाळणे या त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कृती महाराष्ट्रच नव्हे तर देशात खळबळ निर्माण करणाऱ्या ठरल्या. त्यांना मंदिरात जाण्याची हौस नसेलही पण हजारो वर्ष धर्माने मंदिरप्रवेश नाकारला या भावनेतून त्यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. या सगळ्या कामात त्यांना प्रचंड विरोध, दगडफेक सहन करावी लागली. नाईलाजास्तव त्यांनी अखेरीस बौध्द धम्माची लाखो अनुयायांसह दिक्षा घेतली आणि सत्याचा मार्ग निवडला. केवळ आरक्षण आणि अस्पृश्य उध्दार ही बाबासाहेबांची कामे नाहीत. त्यापुढे जाऊन बाबासाहेबांनी इंग्रज काळातच कामगार कायदे, उर्जा व सिंचन धोरण यामध्ये मोलाची कामगिरी केली जी आजही उपयुक्त आहे. हिंदू कोड बिल आणून समस्त स्त्री जातीला न्याय दिला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करून, त्यांच्या दुखण्याची मांडणी करून, धरणे बांधून शेतीव्यवस्थेला आधार दिला. बाबासाहेबांची संसदीय कार्य अजोड होते. पंडीत नेहरूंनी त्यांची विद्वत्ता जोखली होती म्हणूनच संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी निःशंकपणे त्यांच्यावर सोपविली. हजारो वर्षांची विषमता त्यांनी 'स्वातंत्र्य समता बंधुता' या शब्दांमधून संपवून टाकली. परंतु आजही सनातनी विचार, मनुस्मृती मेंदूत सांभाळणारे विचार जिवंत आहेत. बाबासाहेबांना केवळ डोक्यावर न घेता त्यांचे विचार मनात रूजवण्याशिवाय तरणोपाय नाही.
प्रा. शिवानी काकडे यांनी सूत्रसंचालन केले.
COMMENTS