सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सुपे : सुदाम नेवसे
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणारा व नवसाला पावणारा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असलेला बारामती तालुक्यातील सुपे येथील ख्वाजा शाहमन्सूर बाबा दर्ग्याच्या ऊरुसास दि .१६ पासून प्रारंभ होत आहे . महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व ग्रामदैवत असलेल्या ख्वाजा शाहमन्सूर बाबांच्या उरुसानिमित्त परगावी गेलेले बांधव ,आप्तेष्ट ,नातेवाईक सर्वजण एकोप्याच्या भावनेने एकत्रीत येऊन बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतात व उरुसाचा आनंद घेतात . गुरुवार दि.१६रोजी संदल असून या दिवशी शाहीस्नान (देवाला पाणी घालण्याचा) कार्यक्रम असतो.'कोहया' या विहिरीवरून सकाळी १० वाजता फकिरांच्या उपस्थितीत वाद्यांच्या निनादात मंत्रोच्चारीत पाणी आणून बाबांच्या समाधीला स्नान घातले जाते .यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान देवाच्या गलबाची मिरवणूक काढण्यात येते.या दिवशीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रात्री १० वाजता फकिरांच्या जरब टोचण्याचा कार्यक्रम असतो.अंगावरती लोखंडी धारदार सळई टोचण्याचा तलवार मारून घेण्याचा चित्तथरारक कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होते . संदलच्या मिरवणुकीमध्ये अमर बँड, नटराज बँड, न्यू अमर बँड ,नाजिम बॅन्जो पार्टी , फकीरभाई ताशेवाले इत्यादी वाजंत्री सहभागी होतात. पहाटे बाबांच्या समाधीवर गलब चढविण्याचा मान कासार समाजास असतो. शुक्रवार दि.१७ रोजी उरुसाचा मुख्य दिवस असून सायंकाळी सुपे गाव व परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन गव्हाच्या पिठाचे दिवे पाजळुन नवस फेडतात तसेच गुळाची शेरणी वाटली जाते. रात्री ९ वाजता लता-लंका पाचेगांवकर यांचा लोकनाट्य तमाशाचा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि.१८ रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान कव्वालीचा कार्यक्रम असून सर्फराज साबरी (राजस्थान),आफताब कादरी ( इंदौर )यांच्या कव्वालीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.हा कार्यक्रम पहाण्यासाठी महाराष्ट्रातून लोक येत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते.याच दिवशी सायंकाळी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात येतो रविवार दि.१९ रोजी दर्ग्यामध्ये मुस्लिम बांधव नमाज पठण करून कुराण वाचनाचा धार्मिक विधी होतो .यावेळी अल्लामा व मौलाना अहमद नक्शबंदी(हैद्राबाद) हे धार्मिक विचारातून प्रवचन देणार आहेत.जियारत कार्यक्रम होऊन लंगर(भंडारा) होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.चार दिवस चालणाऱ्या या उरुसाच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शाहमन्सूर दर्गाह ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान दर्ग्याची रंगरंगोटी करण्यात आली असून दर्ग्याच्या प्रवेशद्वारावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.संपूर्ण मंडपाचे काम बारामती येथील माया मच्छिंद्र मंडपवाले यांनी केले आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात स्वच्छता करण्यात आली असून लाईट व्यवस्था करण्यात आली आहे..खांबावरील गेलेले दिवे बसविण्यात आले आहेत.
COMMENTS