सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
दोन वर्षापूर्वीच वाई तालुक्यातील शिरगाव येथील निलम हिचा विवाह खानापूरच्या वैभव जाधव याच्याशी झाला होता. विवाह झाल्यापासून सतत कुरबुरी व त्रास देण्याचा प्रकार तिच्या सासरच्या मंडळीकडून होत होता. एक आठवडय़ापूर्वीच गावी पतीपत्नी दोघे येवून गेले होते.
दरम्यान, गुरुवारी रात्री उशीरा कोपरखैरणे येथील खोलीत संशयास्पद मृत्यू झाला असून तिचा खूनच तिच्या पतीसह सासरच्या मंडळीनी केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींकडून करण्यात आला असून शोकाकूल वातावरणात तिच्या पार्थिवावर शिरगाव येथे शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, पतीसह तिच्या सासरच्या मंडळींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत शिरगाव येथील निलम हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी, निलमचे दोनच वर्षापुर्वी खानापूरच्या वैभव शांताराम जाधव याच्यासोबत विवाह झाला होता. शांताराम हे मुलूंड परिसरात खाजगी सावकारीचा व्यवसाय करतात तर वैभव हा खाजगी क्लासेस मुलुंड येथे चालवतो. लग्न झाल्यानंतर निलम हिला त्यांनी कौपरखैरणे येथील खोलीवर नांदवण्यास नेले. तेथे नेल्यानंतर तिला तुच्छतेची वागणूक देण्यास सुरुवात केली. माहेरच्या नातेवाईकांशी बोलण्यास सुद्धा दिले जात नव्हते. निलम आणि तिचा पती वैभव यांच्या दौघांमध्ये गत एक आठवडय़ापूर्वी भांडण झाले होते. त्यानंतर ते गावी आले होते. गावी आल्यानंतर त्यांनी देवदर्शन करुन पुन्हा ते दोघे खोलीवर परत गेले. गुरुवारी रात्री वैभव यानेच शिरगावला फोन करुन निलमबाबत सांगितले. तेव्हा शिरगाव येथून नातेवाईक जावून शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कौपखैरणे येथे पोहचले. खोलीत वरचा पत्रा उचकटून आतमध्ये उतरले. तेव्हा निलम ही ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. कोपरखैरणे पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनी पंचनामा केला. दरम्यान, निलम हिचा मृतदेह शिरगावला आणण्यात आला. शिरगाव येथे शोकाकुल वातावरणात शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, हा निलमच्या घातपाताचा प्रकार असून सुस्वभावी असलेल्या निलम आत्महत्या करु शकणार नाही. तिला सतत पती वैभव, सासरा शांताराम, सासू सुवर्णा आणि नणंद वर्षा हे मारहाण करत त्रास देत होते. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिरगाव येथील भोसले परिवाराच्यावतीने करण्यात आली आहे.