सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील आसणी गावामध्ये गत चार दिवसापासून बिबट्याचा वावर असून आत्तापर्यंत गावातील अनेक कुत्र्यांचा त्याने फाडशा पाडला असल्याने गावातील तसेच परिसरातील जनता भयभित झाली आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतुन होत आहे.
कडक उन्हाळा असल्याने जंगलातील प्राणी पाण्याच्या शोधात भटकत असताना गावामध्ये शिरत आहेत. गावामध्ये शिरणारा बिबट्या शिकार करूनच गावातून बाहेर पडत असल्यामुळे जनतेत भिती निर्माण झाली आहे. या विभागातील अनेक जण महाबळेश्वर येथे नोकरी निमित्ताने जात येत असून रात्री उशिराने घरी येत असतात. अशा वेळी बिबट्याच्या वावरण्याने जिव मुठीत घेवून लोकांना घरी यावे लागत आहे.
आसणी गावातुन अनेक कुत्र्यांचा फाडशा बिबट्याने केला असून कुत्र्यांचा सापडासुप झाल्यानंतर शिकारीची चटक लागलेला बिबट्या जनावरांची , माणसांची शिकार करू शकतो. लोकांच्या मनात भितीचे वातारण असून वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर धनावडे यांनी केली आहे.