सोमेश्वर रिपोर्टर टीम------
ॲड. गणेश आळंदीकर
खरे तर २८ वर्ष सेनादलातून देशसेवा करणे,सुभेदार मेजर पदापर्यंत पोहोचणे ईतके सोपे नसते ते त्यांनी लीलया पार पडले.
कायम धगधगत असलेल्या काश्मीर मध्ये, उल्फा, बोडो अतिरेक्यांनी गाजलेल्या आसाम मध्ये तर कधी पाकच्या सीमेवरील पंजाब प्रांतात बाळासाहेब दत्तात्रय शेंडकर यांनी ११ मराठा लाईफ इन्फंट्री मधे सेना दलात चोख कर्तव्य बजावले.सन २०१६ साली ते निवृत्त झाले.निवृत्त झालेला माणूस थोडा आराम करतो पण त्यांच्यातला देशभक्त आराम करायला मानत नव्हता. आंतरराष्ट्रीय धावपटू व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे व ॲड गणेश आळंदीकर, भाऊसाहेब लकडे यांनी सोमेश्वर स्पोर्टस अकादमी काढली.परिसरात भव्य मॅरेथॉन घेतल्या.या स्पर्धांना हजारो धावपटूंनी हजेरी लावली. बाळासाहेबांनी अनेक निवृत्त सैनिकासह त्यात सक्रिय सहभाग घेतला.त्यांचे काम पाहून सेना दलातील जगन्नाथ लकडे,आळंदीकर यांनी बाळासाहेब शेंडकर यांना आपण आजी आजी सैनिकांसाठी एखादी संघटना काढू व त्याचे नेतृत्व तुम्ही करा अशी विनंती केली.बाळासाहेबांनी ते मान्य केले .रितसर धर्मादाय आयुक्त कार्यालयात संघाची नोंदणी झाली.अनेकांनी ते अध्यक्ष पदी काम करू शकतील का अशा शंका उपस्थित केल्या व विरोध ही केला मात्र मॅरेथॉन वेळी त्यांचे काम पाहून प्रभावित झाल्याने लकडे साहेब व आळंदीकर यांनी बाळासाहेबच ते काम करू शकतील अशी खात्री बाळगली व खंडू लकडे यांनी त्यासाठी कार्यालय देखील बांधून दिले. त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवत सोमेश्वर पंचक्रोशी पासून सुरुवात करून राज्यभर गरजूंना व देशभरातील सैनिकांना मदत करीत तो विश्वास सार्थ ठरवला.
सैनिक संघटना स्थापन करून निवृत्तीनंतर पेन्शन मधे येणाऱ्या समस्या, शहीद जवानांच्या वीर पत्नींना येणाऱ्या समस्या , ऑन ड्यूटी सैनिकांच्या अडचणी, रस्त्याचे वाद, बांधाचे वाद त्यानी सैनिक संघटनेची तक्रार निवारण कमिटी करून मिटविले.पेशाने वकील असलेल्या गणेश आळंदीकर यांना त्याचे अध्यक्षपद देऊन प्रत्यक्ष ग्राउंड वर स्वतः जाऊन शेकडो सैनिकांचे प्रश्न त्यांनी मिटविले.
ऑन ड्यूटी सैनिकांना त्यांच्या घरी पाणी नाही इथपासून घरगुती सर्व वाद मिटविले. कुणाचे पैसे कुठे अडकले तर त्या त्या संस्थात जाऊन त्यांना ते मिळवून दिले.एखाद्या सैनिकाला पोलीस कारवाई मधे कुणी अडकवत असेल तर बाळासाहेब रात्री अपरात्री पोलिस स्टेशन मध्ये बसून राहत असत .पोलिसांना निवडणूक काळात सैनिकांची गरज पडली की बाळासाहेब लगेच फोना फोनी करून १५/२० जणांची यादी देत व निवडणूक ड्युटी साठी जात.सुमारे १५० च्या वर वाद त्यानी सैनिक संघटनेद्वारे मिटविले.याशिवाय सैनिकांना घरपट्टी माफी साठीचे कागदपत्रे ई .बाबी जिल्हा सैनिक कार्यालयाद्वारे माहिती घेऊन त्यांना पोहोच करणे.सैनिकाच्या हयातीचे दाखले वैगेरे सर्व सैनिक संघटना कार्यालयात त्या त्या व्यक्तीला नेमून करून घेत असत.
हे सर्व करत असताना कारगील विजयोत्सव साजरा करणे,पुलवामा सारख्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणे, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी अगदी पोलीस भरती पासून ते लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचे सत्कार करणे,कधी एखाद्या सैनिकाचा मुलगा यशस्वी झाला तर त्याचे मार्गदर्शन संघटनेच्या कार्यालयात ठेवणे,एखाद्या शहीद व्यक्तीचे स्मारक उभे राहत असेल तर संघटनेद्वारे मदतीचे आव्हान करून शक्य तितकी मदत करणे,परिसरात अपंग ,अपघाती व्यक्ती ला अर्ध्या तासात ४२ हजाराची मदत मिळवून देऊन ते सामाजिक कर्तव्य पार पाडत होते.
मराठा क्रांती संघटनेद्वारे आयोजित रक्तदान शिबीर असो अथवा पोलिसांनी आयोजित रक्तदान शिबीर असो , सोमेश्वर पत्रकार ग्रुप आयोजित रक्तदान शिबीर असो प्रत्येक रक्तदान शिबिरात संघटनेद्वारे सक्रिय सहभाग घेऊन बाळासाहेब सामाजिम बांधलकी जपत.
सन २०१९ साली महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर सैनिक टाकळी येथे पुराने मोठे नुकसान झाले. बाळासाहेब शेंडकर यांनी आपण संघटनेद्वारे काय करू शकतो हे पाहून समाजाला मदतीचे आव्हान केले वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे सहकार्याने एक टेम्पो भरून किराणा ,कपडा ,खाऊ व संसार उपयोगी वस्तूचे वाटप करण्यासाठी सैनिकांना घेऊन गेले.
सैनिकांची बचत व्हावी त्याद्वारे दोन पैसे शिल्लक राहावेत या उद्देशाने अनेक बचत गट त्यानी उभे केले .महिलाना प्राधान्य देत त्यांना नेतृत्व दिले. पुढे २०२०. २१ मधे कोरोनाचा काळ आला. पुन्हा बाळासाहेब मदतीसाठी सज्ज. कोरोना काळात या बचत गटाद्वारे अनेकांना नवीन उद्योगासाठी अर्थसहाय्य या काळात झाले. बारामती शहरात प्रत्येक पोलीस स्टेशन ला त्यांनी सॅनिटायझर वाटप केले. वाणेवाडीत पुरुषोत्तम दादा जगताप यांच्या मदतीने कोरोना मदत केंद्र उभारले होते तिथे जाऊन कोरोना पीडितांना मदत केली.
सुमारे तीनशे किराणा किट पंचक्रोशीतील दानशूर व सैनिकांच्या मदतीने त्यांनी गोळा केले.परप्रांतीय, मजूर,पारधी समाजातील गोर गरीबांना कोरोना काळात ज्यांचे व्यवसाय ठप्प झाले त्यांना या किराणा किट द्वारे मदत त्यांनी केली. एकदा समाजसेवा ग्रुप वर एक गरजुला मदतीची गरज आहे अशी पोस्ट पाहिली त्वरीत सहा सात जणांकडून सात हजाराची मदत त्याला दिली.
या शिवाय एखादा मुलगा एखाद्या स्पर्धेत यशस्वी झाला की त्याला लगेच बोलावून त्याचा संघटनेत सत्कार करायचा. त्याला थोडी फार मदत करायची. कुणाचे लग्न असो अथवा एखादा जवान शहीद झाला असो त्वरीत गाडी घेऊन किमान चार पाच सैनिक घेऊन बाळासाहेब हजेरी लावत असता.हे काम बाळासाहेब शेंडकर यांनी केले.
एवढ्यावरच न थांबता कोरोना काळात डॉ मनोज खोमणे सारख्यांचे मार्गदर्शन त्यानी ग्रामस्थ व सैनिकांना करून दिले.कुणाला बेड मिळत नव्हते तर त्यांना विनंती करून अनेकांचे जीव वाचवले. याशिवाय ज्यांनी ज्यांनी कोरोना काळात समाजोपयोगी काम केले त्यांचे साठी त्यांनी भव्य कार्यक्रम घेऊन पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पुरुषोत्तम दादा जगताप व मान्यवरांच्या हस्ते सन्मान केले. पहलगाम हल्ल्यात मृतांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम तर साजरा केलाच पण सामाजिक सलोखा रहावा म्हणून त्यांनी हिंदू मुस्लिम एकत्र येऊन भारताच्या हल्ल्याचे समर्थन करीत आतंकवाद्याचे प्रतिकात्मक दहन केले. हे कार्य सैनिक संघटनेचे व बाळासाहेब शेंडकर यांचे होते .
सेना दलातील जवान कधीच म्हातारा होत नाही तो जवानच असतो हे बाळासाहेब शेंडकर यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या निवृत्तीनंतर केलेले काम शब्दातीत आहे. कोणताही सरकारी निधी नसताना केवळ लोकसहभागातून व सैनिकाच्या मदतीने बाळासाहेब शेंडकर यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केला . व अचानक सोमवारी सकाळी त्यांना हृदयविकार झटक्याने देवाने आमचेपासून हिरावून घेतले .त्यांचे जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या रुपाने खरा देशभक्त हरपला आहे. अशा महान नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली ...त्यांचे कार्य जवळून पाहिलेला साक्षीदार....