सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन, भुईमुग, घेवडा, ज्वारी इत्यादी पिकांची पेरणी करण्याची संधीच मिळालेली नाही आणि ज्या २० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांची सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पिकांची पुर्णपणे नासाडी झाली आहे. आजअखेर पाउस सुरूच असल्याने या वर्षीच्या हंगामी पिकांची पेरणी होवूच शकणार नाही. म्हणुनच महाराष्ट्र राज्य शासनाने जावली तालुक्यास ओला दुष्काळ जाहीर करून आमच्या जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाच्या वतीने तहसिलदार हणमंत कोळेकर यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की सातारा जिल्हयातील जावली तालुका हा अल्प भु-धारक शेतकऱ्यांचा तालुका आहे. जावली तालुक्यातील बहुसंख्य लोक माथाडी कामगार म्हणून मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पुणे या परीसरात माथाडी स्वरूपाची कामे करतात आणि आपल्या हक्काची शेती करून उदरनिर्वाह चालवितात. परंतू १६ मे २०२५ पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचे नंतर मोसमी पावसामध्ये रूपांतर झाले आणि आजअखेर पाउस सुरूच आहे त्यामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
केंद्र शासनाने निश्चीत केलेल्या नैसर्गीक आपत्ती योजनामध्ये प्रामुख्याने चक्रीवादळ, ओला दुष्काळ, भुकंप, आग, पुर, गारपीट, दरड कोसळणे, ढगफुटी, थंडीची लाट, शेतीपिकाचे नुकसान किंवा इतर नुकसानीकरीता राज्य आपत्ती निवारण योजना निधीमधून पिडीतांना मदत करणे गरजेचे आहे. असा नियम असतानाही आजअखेर महाराष्ट्र राज्य सरकारी यंत्रणा किंवा इतर कोणत्याही यंत्रणेने याची दखल अद्याप घेतलेली नाही. महसुल मंडल अधीकाऱ्यांनी सतत पडणाऱ्या पावसाची दखल घेवून प्रत्येक गावामधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणे आत्यावश्क होते. जेणेकरून सरकार दरबारी जावली तालुकामध्ये सतत पडणाऱ्या पावसाची नोंद घेवून 'ओला दुष्काळ' जाहीर करण्यास मदत झाली असती. परंतू आजअखेर कोणतीही यंत्रणा शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर आलेली नाही असा प्रशासना विरोधात आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाच्या वतीने सातारा जावली विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे व माथाडी कामगार नेते विठ्ठल गोळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. पंचायत समिती पासून मोर्चाला सुरुवात होवून तहसिल कार्यालय येथे सांगता झाली. यावेळी अनेकांनी शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान याबाबत भावना व्यक्त केल्या. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चामध्ये समिंद्रा जाधव रुपाली भिसे, मोहनराव शिंदे, बुवासाहेब पिसाळ, आनंदराव जुनघरे, रामदास पार्टे, राजश्री शिंदे, सोमनाथ कदम, रोहीत रोकडे, प्रमोद पवार, समिर डांगे, सुनिल फरांदे, राजेंद्र कदम, चंद्रकांत गवळी, नारायण शिंगटे, वसंत शिंदे, मोहन देशमुख, राम कदम आदी सहभागी झाले होते.