सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीचे अस्तित्व टिकवण्यासाठी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज असून, मातीचे आरोग्य जपणे आणि उत्पादन खर्च कमी करणे यासाठी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केव्हीके बारामतीचे कृषी विस्तार गोडसे यांनी व्यक्त केले.
बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथे ‘खेती बचाओ अभियान २०२६’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, मातीची सुपीकता टिकविण्याचे उपाय, जैविक व सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक शेतकऱ्याची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शनानंतर शेतकऱ्यांनी विविध कृषी विषयांवर प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांची गावपातळीवर सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन कृषीदूत देवदत्त पुरंदरे, निखिल नाळे, ईश्वर कुंभार, राहुल आकिवाटे, अनिकेत कावळे, निमीश हिंडणे, ऋषी पाठक व तेजस वाबळे यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
