सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा वाढलेला धोका लक्षात घेऊन भोर–महाड मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील वरंधा घाट रस्ता ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.
पावसाळ्याच्या काळात घाट परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे राजेवाडी ते वरंधा या दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून वाहनचालकांनी प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी माणगाव–निजामपूर–ताम्हिणी घाट–मुळशी–पिरंगुट–पुणे हा पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे. तर कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी राजेवाडी फाटा–पोलादपूर–महाबळेश्वर–वाई–सातारा–कराड–कोल्हापूर किंवा पोलादपूर–खेड–चिपळूण–पाटण–कराड–कोल्हापूर या मार्गांचा वापर करावा.
प्रशासनाने वाहनचालकांना बंदीच्या आदेशाचे पालन करून पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
