सोमेश्वर रिपोर्टर टीम----
महाबळेश्वर : सचिन भिलारे
महाबळेश्वर तालुक्यात निसर्गाचा कोप पाहायला मिळत असून नावली गावात शनिवारी सकाळी झालेल्या अत्यंत मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूचा डोंगर भाग अचानक खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भूस्खलनामुळे डोंगरावरील महाकाय झाडांसह मोठ्या प्रमाणात मातीचा आणि दगडांचा मलबा थेट रस्त्यावर कोसळला असून परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्ता मोकळा करण्यासाठी मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या गंभीर घटनेनंतर महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन म्हस्के आणि प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली असून संपूर्ण यंत्रणेला हायअलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे कडक निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
जमीन खचलेल्या भागाच्या अगदी जवळच नावली गावाची मुख्य पाण्याची मोठी टाकी असल्याने प्रशासनाने या ठिकाणी विशेष आणि कडक खबरदारी घेतली आहे. सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या थेट निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या पाण्याच्या टाकीची प्रत्यक्ष तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने राबविण्यात येत आहेत. या धोकादायक परिसरातील चार घरांपैकी एक घर आधीपासूनच बंद असून, उर्वरित तीन घरांतील रहिवाशांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची समजूत घातली असून स्थलांतराची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवांना उधाण आले असून प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास न ठेवण्याचे कडक आवाहन केले आहे. तहसीलदार सचिन म्हस्के यांनी अधिकृत माहिती देताना स्पष्ट केले की, सध्या संपूर्ण नावली गावाला कोणताही तातडीचा किंवा मोठा धोका नाही, त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये आणि केवळ प्रशासनाकडून अधिकृतपणे जाहीर होणाऱ्या माहितीलाच महत्त्व द्यावे. महाबळेश्वर तालुका प्रशासनाकडून या संपूर्ण परिस्थितीवर २४ तास सातत्याने बारीक लक्ष ठेवण्यात येत असून संभाव्य आपत्ती रोखण्यासाठी सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत.
