Purandar News l बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक व्यवस्थापनात बदल गरजेचा; राजेंद्र पवार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : पंढरीनाथ शिंदे 
बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, ऋषी विज्ञान केंद्र बारामती, महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोळविहिरे येथे रब्बी पूर्व पीक नियोजन अभियान कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. यावेळी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक नियोजन व आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.
कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे पीक पद्धती व पीक व्यवस्थापनात आवश्यक बदल करणे काळाची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. रब्बी कांदा व्यवस्थापन व साठवणूक, कांदा बीजोत्पादन, मुक्तसंचार गोठा, मुरघास तंत्रज्ञान, काटेकोर ऊस उत्पादन, कोरडवाहू भागातील पीक व्यवस्थापन, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत फवारणीद्वारे खत देणे, शेतकरी गटांची स्थापना तसेच जलसंधारण व भाजीपाला लागवड याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली.

कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मृदाशास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी रब्बी कांदा उत्पादन, खत व्यवस्थापन, लागवड पद्धती, साठवणूक, रोपवाटिका तसेच ऊस व इतर रब्बी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कोळविहिरे ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या वतीने राजेंद्र पवार यांचा सन्मान करण्यात आला. सहाय्यक कृषी अधिकारी स्नेहलता जाधव, प्रकल्प सहाय्यक ओंकार ढोबळे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top