वाहनांच्या कागदपत्रांच्या वैधतेस
30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ
बारामती प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार, संजय धायगुडे, उप प्रदेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांनी ज्या वाहनांच्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 पासून संपलेली आहे, त्यांची वैधता मुदत 30 सप्टेंबर 2020 पर्यंत राहिल असे एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
मालवाहतुकीच्या वाहनांना केंद्र शासनाने वाहतूकीस परवानगी दिली आहे. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत वाहन मालकांना मोटार वाहन कायदा, 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 खालील कागदपत्रांच्या वैधतेचे नुतनीकरण करण्यास अडचणी येत आहेत. अशा कागदपत्रांची ज्यांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 पासून संपलेली असेल म्हणजेच वाहनचालक अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्ती, वाहनाचा कोणताही परवाना, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र व वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या वैधतेची मुदत 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
तसेच ज्या अर्जदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 32 व नियम 81 नुसार अर्जासाठी शुल्क जमा केले आहे, मात्र ती कामे लॉकडाऊनमुळे होऊ शकली नाहीत असे शुल्क वैध समजण्यात येईल किंवा विलंबाने शुल्क भरले असल्यास त्यावर अतिरिक्त किंवा विलंब शुल्क आकारले जाणार नाही.
संबंधित वाहनधारकांनी वैधता नुतनिकरणासाठी कार्यालयात घाई/गर्दी करुन नये. परिवहन विभागाने वैधता नुतनीकरणासाठी अर्ज करणे, शुल्क भरणे व अपॉईंटमेंट घेणे या सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध केल्या आहेत त्याचा सर्व संबंधितांनी लाभ घेऊन कार्यालयातील गर्दी टाळावी असेही, आवाहन संजय धायगुडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांनी केले आहे.
COMMENTS