धारावी कोरोनामुक्त होऊ शकते तर सासवड का नाही ?
पुरंदर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील दाट वस्ती असलेल्या मुंबईतील धारावी मध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र मुंबई महानगरपालिका व धारावीकारांनी धारावी आपलं गाव आहे व घर आहे असं समजून त्या पद्धतीने कोरोना मुक्तीकडे वाटचाल केली. त्याच धर्तीवर सासवड नगरपालिका व सासवडकर नागरिकांनी पाऊल टाकले तर सासवड कोरोनामुक्त होऊ शकत नाही का? चला तर आपले कर्तव्य आपण बजावूया आपलं गाव, आपला प्रभाग, आपली आळी कोरोना मुक्त करूया.
पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह संसर्गाची गती काही केल्या थांबताना दिसत नाही. काल शुक्रवारी शहरात तब्बल १६ रुग्ण वाढून शहरात कोरोनाबाधितांची संख्या १९१ वर पोहचली आहे. ससवड शहर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संखेत द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोचले आहे.
सासवड शहर पुण्याजवळ असल्याने पुण्यात दररोज कामा धंद्या निमित्त जा - ये करणारे लोक 'होम क्वारंटाइन' राहत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातून अल्पावधीत पुरंदर तालुक्याने कोरोना बाधितांचे त्रिशतक झाले, तर सासवड द्विशतकाच्या उंबरठय़ावर पोचले आहे. विस्कळीत व अपुरी व्यवस्था, चोरटे मार्ग, लोकांचे अज्ञान, आजही संध्याकाळी लोक समुहाने फिरतात, समुहाने गप्पा गोष्टी करतात, अगदी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या आळीतही लोक समुहाने दिसून येतात, आजही किराणा मालाच्या दुकानातील गर्दी जाणवत आहे, आखाड साथीमुळे लोक आजही गावा बाहेर जेवायला जात आहेत, विवाह समारंभ व अंत्यविधी समयी लोक गर्दी करत आहेत, वय वर्ष ५५ च्या पुढच्या लोकांनी सार्वजनिक कार्यक्रमांना जाऊच नये असे फार्मन असतानाही, ज्येष्ठ नागरिक सहज अशा कार्यक्रमांमध्ये दिसून येत आहेत. सासवडमधील मृतांच्या आकड्यांमध्ये बहुतांश लोक हे वय वर्ष ५५ च्या पुढची आहेत. विशेषता या ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. लोकसहभाग व लोकांना विश्वासात घेतले जात नाही असा आरोप काही सजग नागरिक करत आहेत. पण महसुल, नगरपालिका, आरोग्य प्रशासन आपले काम चोख बजावत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. लोकांनी त्यांना सहकार्य करणे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे हा एकमेव उपाय सासवड कोरोना मुक्तीसाठी आहे.
काही मोजक्या लोकांच्या मनात भिती आहे पण बहुतांश लोकांच्या हेकेखोर व बेजबाबदार पणामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. यातून परिस्थिती अवघड होत असल्याचे संकेत मिळत आहेत. सासवड शहरातील बहुतांश लोक मुळ निवासी नाहीत ते तलुक्यात आपल्या मुळ गावी सहज फेरफटका मारायला किंवा शेतीची कामे करण्याच्या निमित्ताने भटकत असतात.
लोकडाउन असताना सासवड व पुरंदरमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता मात्र. लाॅकडाउन थोडा शिथील झाला व ही अवस्था झाली. लॉकडाऊन पूर्ण उठवला तर गुणाकाराचा वेग किती असेल, याची चिंता आहे. पुरंदर तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे २६ रुग्ण निष्पन्न होऊन तालुका त्रिशतक पार करून ३२५ वर पोचला. अल्पावधीतच १२ बाधीतांचे मृत्यू मात्र हादरवून टाकणारे व चटका लावून जाणारे ठरले आहेत.
पुरंदर तालुक्याचे मुख्यालय सासवड शहर आहे. येथे निम्मे सासवडकर तालुक्याच्या ग्रामीणमधील लोक आहेत, असे रहिवासी शेती, नोकरी, धंद्यानिमित्त जा- ये करणारे व फिरून काम करणारे अधिक आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास सूक्ष्म उपाययोजना राबविणे गरजेचे आहे, हे स्पष्ट होत आहे.
सासवडमध्ये आजही घातक पदार्थांच्या छोट्या प्लॅस्टिकच्या पुड्या रस्त्यावर चौकाचौकात पडलेल्या दिसतात या पुड्या व चौकातील पिचकाऱ्या हा संशोधनाचा विषय आहे. या पिचकाऱ्या जोपर्यंत थांबत नाही बहुदा तोपर्यंत कोरोना थांबत नाही असे चित्र आहे. कारण सासवड हे नाव ज्यासाठी प्रसिद्ध आहे. आता ते तेच सासवडचे नाव कमी करण्यामध्येही आहे. जर मागील काळात सासवड शहराला आंतरराष्ट्रीय स्वच्छतेचा पुरस्कार मिळत असेल आणि चौका चौकातल्या पिचकार्या थांबत नसतील तर ही सासवड करांसाठी धोक्याची घंटा आहे.
संजय जगताप : आमदार पुरंदर-हवेली
'पुरंदर मधील वाढत्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे सासवडसह पुरंदर मध्ये ५ प्रायमरी टेस्टिंग मशीनची मागणी करण्यात आली आहे. यापैकी एक मशीन मागील आठ दिवसांपूर्वी हॉटस्पॉट असलेल्या लांडगे आळीमध्ये बसविण्यात आली आहे. त्याद्वारे सुमारे १ हजार लोकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या असून पुढील काळात पुरंदरच्या ग्रामीण भागामध्ये अशा मशीन बसविण्यात येणार आहेत. या मशीनमध्ये मानवी शरीरातील ३२ प्रकारच्या व्याधींच्या तपासण्या केल्या जातात. त्यामुळे थोडा जरी त्रास असेल तर तो लवकर निदर्शनास येऊन विशेष काळजी घेतली जाईल. तरी यापुढे ५५ वर्षाच्या पुढील व १० वर्षाच्या आतील व्यक्तींनी कुठल्याही परिस्थितीत घरातून बाहेर पडू नये. जर सासवडची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तर धारावी प्रमाणे सासवडमध्ये ही 'नो वन गेट आऊट एन्ड नॉन गेट इन अशी योजना राबवावी लागेल.'
COMMENTS