रणजीत शिवतरे यांच्या प्रयत्नाने हजारो हेक्टर येणार ओलिताखाली
भोर : प्रतिनिधी माणिक पवार
वेल्हा आणि भोरमधून जाणाऱ्या नदीवरील १२ बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी गेली ८ वर्षे प्रयत्न करत असूनही मंजुरी मिळत नसल्याची महत्वपूर्ण बाब जिल्हा परिषदेचे रणजीत शिवतरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. शिवतरे यांच्या पाठपुराव्याची तत्काळ दखल घेत बंधारा दुरुस्तीसाठी ९ कोटी ५० लाख निधीची मंजुरी देण्याचे आदेश अजित पवार यांनी जलसपंदा विभागाला दिल्याने हजारो हेक्टर ओलिताखाली येणार असल्याने शेतकरी वर्गातून पवार आणि शिवतरे यांचे अभिनंदन मानले आहे.
पुणे विश्राम गृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीत गुंजवणी, कानंदी व निरा नदीवरील प्रत्येकी ४ असे एकूण १२ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची मंजुरी देण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रमोद काकडे, जिल्हाधिकारी राजीवकुमार देशमुख, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे आदी उपस्थित होते. बैठकीत शिवतरे यांनी गुंजवणी, कानंदी व नीरा नदीवरील उर्वरित बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामांना सुध्दा मंजुरी देण्याची मागणी केली. दरम्यान, बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याविषयी तत्कालीन मंत्री रामराजे निंबाळकर यांच्याकडे मागणी केली असता त्यावेळी अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते,परंतु आजअखेर त्याला मंजुरी मिळाली नसल्याने भोर-वेल्हा तालुक्यातील नदीवरील बंधारे नादुरुस्त असल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नव्हते.
गुंजवणी, कानंदी व निरा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची विशेष दुरुस्ती करण्यासाठी फेर अंदाजपत्रकासह (एकूण रक्कम रु ९.५० कोटी) प्रस्ताव कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग यांच्याकडे प्रलंबित होता. उ[उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी उपस्थित असेलेले जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत यांना तत्काळ मंजुरी देण्यासाठी आदेश दिले. जलसंपदा महामंडळाच्या पाणीपट्टी करातून उपलब्ध असलेल्या निधीतून सदर कामांना मंजुरी देता येईल,असे कार्यकारी संचालक राजपूत यांनी मान्य करून तत्वतः मंजुरी दिली. सदर निर्णयामुळे गेली अनेक वर्षे प्रलंबित भोर तालुक्यातील निरा नदीशेजारील अंदाजे २५ गावांचे ८१० हेक्टर, गुंजवणी नदीशेजारील अंदाजे १५ गावांचे १००९ हेक्टर,तसेच वेल्हा तालुक्यातील कानंदी,गुंजवणी नदी शेजारील २६ गावांचे १२७३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. सदर बंधाऱ्यांची दुरुस्ती होण्यामुळे २६१ द.श.घ.फु.पाणी साठवण होणार असून एकूण ३०९२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
COMMENTS