'सोमेश्वर' चे होणार विस्तारीकरण, ७० कोटी ३७ लाखाचा खर्च : अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर च्या कार्यक्षेत्रात उसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता सोमेश्वर कारखान्याचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. तसेच कारखान्याचे कामगार आणि ऊसतोडणी कामगार यांच्यासाठी जिल्हा परिषद आणि कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या ५९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रतिपन समारंभ रविवारी (दि.४) रोजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि त्यांच्या पत्नी रोहिणी जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी जगताप बोलत होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, उपाध्यक्ष शैलेंद्र रासकर, संचालक नामदेवराव शिंगटे, सिध्दार्थ गीते, किशोर भोसले, महेश काकडे, विशाल गायकवाड, सुनिल भागात, हिराबाई वायाळ, अधिकारी व कामगार उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले की, सोमेश्वर सहकारी कारखान्याने सातत्याने वाढत असलेल्या ऊस उत्पादनावर तोडगा म्हणून विस्तारीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये गाळपाची पाच हजार टन क्षमतेहून साडेसात हजार टन प्रतिदिन इतकी क्षमता होणार आहे त्यामुळे १० लाख मे.टन गाळप करू शकणारा कारखाना आता १४ ते १५ लाख टनाचे गाळप करेल, विस्तारीकरण होत असल्याने यापुढील कारखाना परीसरात होणाऱ्या अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न निकाली लागला असून सभासदांना याचा फायदा होणार आहे.
कारखाना विस्तारीकरणासाठी ७० कोटी ३७ लाख रुपये खर्च येणार असून २५०० टन प्रतिदिन क्षमतेची जुनी मिल सुरु केली जाणार आहे. जुन्या मिलवरील २० टन क्षमतेचे दोन बॉयलर दुरुस्त करून वापरले जाणार आहेत. बॉयलिंग हाऊस मात्र नवे बांधले जाणार आहे. हे विस्तारीकरण सन २०२१-२२ च्या हंगामासाठी उपयुक्त होणार आहे. १ ऑक्टोबर २०२१ पूर्वी हे विस्तारीकरण पूर्ण होणार असून जुन्या यंत्रणेला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन हे काम पूर्ण करण्याचा संचालकमंडळाचा मानस असल्याचे जगताप यांनी सांगितले.
सध्या ऊसतोडणी कामगारांचा संप सुरु आहे तो मिटताच १५ ऑक्टोबर पासून हंगाम सुरु करणार आहोत. चालु वर्षी १२ लाख मे.टन ऊसाचे गाळपाचे उद्दिष्ट असून संपूर्ण ऊस गाळपास प्राधान्य देणार आहोत. तसेच नियमबाह्य ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची तोडीची जबाबदारी कारखाना घेणार नाही.यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः ऊसतोडून कारखान्यावर आणावा अथवा दुसरीकडे घालावा असेही जगताप यांनी सांगितले.
...
COMMENTS