करंजे ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------
करंजे(ता. बारामती) ग्रामपंचायतीत झालेल्या अनियमितेबाबात, हिशोबपत्रके, बोगस बिले आणि अतिक्रमणाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक रहिवाशी राकेश गायकवाड यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बारामतीच्या गटविकास अधिकाकारी तसेच तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
काही वर्षांपासून गावाला विकासापासून वंचित ठेवण्याचे काम विद्यमान सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांनी केलं आहे १९७७-७८ साली विद्यमान सरपंच यांचे सासरे गुलाबराव बाबुराव गायकवाड हे सदस्य असताना आपल्या पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायत मालकीची गावठाण मोकळी अर्धा एकर जागा आपल्या वडिलांच्या नावे लावून घेतली आहे. माहिती अधिकरात माहिती मागितली असता ग्रामपंचायतीकडे कुठलीही दप्तरी नोंद नाही. त्याच्यामुळे विद्यमान सरपंच या अतिक्रमणामुळे अपात्र ठरत असल्याचे दिसून येत आहे. सरपंच जया संताजी गायकवाड यांचे पद या नियमानुसार रद्द करण्यात यावे, अतिक्रमण हे गावठाण जमा व्हावे, या जागेतून भूमिहीन नागरीकांना घरकुल योजना ग्रामपंचायतीने राबवावी, ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेला भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, सीसीटिव्ही खरेदीत भ्रष्टाचार झाला असून गावठाणातील बोगस नोंदीची चौकशी व्हावी, खोटे कंत्राटदार दाखवून ग्रामपंचायत, गावातील जनतेची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सरपंचावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, घरगड्यांच्या नावे खोटी व बोगस बीले काढून पैशांचा गैरव्यवहार झाला आहे, कोरोना काळात बोगस बीलांचा वापर करून लोकांच्या जीवाशी खेळ केला, कोणतीही कामे न करता खोटी बीले तयार करून फसवणूक झाली आहे त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.
गावात रस्ता मुरुमीकरण या नावाखाली खर्च दाखवला गेला परंतु असे काम कोठेही झालेले नाही, इलेक्ट्रॉनिक्स बीले खोटी आहेत, वृक्ष लागवड, स्मशानभूमीची स्वच्छता व ओढा खोलीकरण या नावाखाली एकाच व्यक्तीच्या नावे लाखो रुपयांचे चेक काढण्यात आले आहेत, कोरोना काळात आशा कार्यकर्त्यांनासाठी किट विकत घेतले याचीही चौकशी व्हावी, लेखापरीक्षण अहवाल दिलेला नाही, आॅफिस साहित्य म्हणून लाखो रुपयांचा खर्च दाखवला आहे, ते साहित्य नक्की कुठे ठेवलं आहे, ते ग्रामपंचायत मध्ये आणून ठेवण्यास सांगावे, मर्जीतील लोकांच्या नावे बोगस बीले काढून जनतेच्या पैशांचा अपहार केला आहे त्यामुळे प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी राकेश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जया गायकवाड - सरपंच करंजे
जी जागा बळकावल्याचा किंवा अतिक्रमणाचा संबंधिताने आरोप केला आहे ती जागा सरकारी वा गावठाण नाही. सन १९६८ साली माणिकचंद शहा यांच्याकडून बाबु धनु गायकवाड यांनी २०० बाय १०० फूट अशी जागा खरेदी केली असून त्याचा दस्त उपलब्ध आहे. आता ही जागा त्यांचे वारसदार म्हणून आमचे सासरे गुलाबराव गायकवाड यांच्या नावे २०१७ मध्ये मागील पंचवार्षिक कालावधीत लावण्यात आलेली आहे. आमच्या अतिक्रमणाचा विषयच येत नाही उलट तक्रारदार व्यक्तीचेच स्वतःचे अतिक्रमण आहे. शिवाय ग्रामंपायतीत कुठलाही भ्रष्टाचार, अनियमितता वा बोगसपणा नाही. कुठल्याही पुराव्याशिवाय बेभानपणे आरोप करणे चुकीचे आहे. ग्रामपंचायतीचे २०१८ पर्यंत ऑडीटही झालेले आहे. उलट तक्रारदार व्यक्ती आपल्या शिवसेना पक्षाच्या लेटरपॅडचा गैरवापर करून स्वतःच्या पक्षाची आणि गावाचीही बदनामी करत आहे. त्याच्याविरोधात अब्रुनुकसान भरपाईचा दावा दाखल करणार आहोत.
COMMENTS