सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, बारामती. येथे मराठी विभागाच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने जागतिक मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी साहित्याचे अभ्यासक आणि लेखक संभाजीराव गायकवाड हे मार्गदर्शक वक्ते म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. देविदास वायदंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन समितीचे सदस्य, नितीन कुलकर्णी, सहसचिव सतीश लकडे आणि निवृत्त पोलिस अधिकारी हुंबरे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. जया कदम यांनी केले होते. प्रमुख मार्गदर्शक संभाजीराव गायकवाड यांनी 'वाचन संस्कृती' या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण, वैचारिक उंची गाठणारे आणि सहज-सुंदर, सोप्या शैलीत आणि प्रेरणादायी आणि प्रेरक अशा आत्मचरित्रातील अनेक उदाहरणे देत मराठीच्या अस्तित्वाचा आणि भवितव्याचा वेध घेतला. वाचनाचे महत्व व्यक्त करताना ते म्हणाले की, "वाचन हे एक ज्ञानार्जनाचे साधन आहे. वाचन संस्कार आणि संस्कृती संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपाय आहे. वाचन हा मने घडविणारा सुसंस्कार आहे. निर्भेळ आनंद देणारा आनंदयोग आहे. वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. वाचनाच्या तपश्चर्येमुळे अनेक माणसं विद्वान आणि अजरामर झाली. पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बालकांपासून ते आजोबांपर्यंत सगळीच माणसे दूरदर्शनच्या भोवती केंद्रीत झालेली दिसतात. तासन् तास टी. व्ही. समोर बसणारी माणसं स्वतःसाठी दररोज चार ओळी वाचायलाही तयार नाहीत. परिणामी संस्कृती अधःपतनास सुरुवात झाली असल्याची भावना व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य देविदास वायदंडे यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यिक योगदानाचे कौतुक करून मराठी भाषेला खूप जुना इतिहास असल्याचे नमूद केले. आपल्या जन्मदात्या आईइतकीच भाषा ही आपल्या जवळची असते. ती संपूर्ण मानव जातीची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि भावनिक गरज असते. आज वाचन संस्कृती जपायची असेल तर वाचकांचा वर्ग वाढवला पाहिजे. तसेच, संपूर्ण साक्षरता निर्माण करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटसारख्या आधुनिक साधनावर प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे. याचा उपयोग वाचकांनी केला पाहिजे. डॉ. जया कदम यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हटले की, "२७ फेब्रुवारीला दरवर्षी 'मराठी राजभाषा दिन' साजरा केला जातो. मराठी भाषेचे गोडवे सांगणाऱ्या 'पोस्ट' एकमेकांना टाकल्या की, वर्षभराचं 'मराठी भाषेबद्दल प्रेम दर्शविण्याचं' काम होऊन जातं असा कित्येकांचा समज आहे. खरंतर उजाडणारा प्रत्येक दिवस हा मराठी भाषेचाच मानला गेला पाहिजे. आजच्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी भाषा टिकवण्याचा संकल्प केला पाहिजे. मराठी भाषेला खूप जुना इतिहास आहे. मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर, तिच्यात श्रेष्ठ आणि स्वयंपूर्ण अशा साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि तो तिचा हक्क आहे. शासनाबरोबर मराठी भाषा टिकवणे आणि ती अधिकाधिक समृद्ध करणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे." याप्रसंगी श्री शिवछत्रपतींची वैचारिक शिवजयंती या उपक्रमांतर्गत शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे लिखित पन्नास ग्रंथांचा संच बारामती चैनलच्या वतीने महाविद्यालयातील ग्रंथालयाला सप्रेम भेट देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलम देवकाते यांनी केले तर डॉ. राहुल खरात यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. जवाहर चौधरी, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप, प्रा. मेघा जगताप, प्रा. अच्युत शिंदे, डॉ. बाळासाहेब मरगजे, डॉ निलेश आढाव, डॉ. नारायण राजुरवार, डॉ. दत्तात्रेय डुबल, प्रा. आदिनाथ लोंढे, प्रा. पोपट जाधव, दत्तात्रेय जगताप, डॉ. कल्याणी जगताप, डॉ रेश्मा पठाण, प्रियंका तांबे आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
COMMENTS