सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी बावधन येथील ऐतिहासिक व पारंपारिक बगाड यात्रा मंगळवारी काशीनाथाचं चांगभलंच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. मागील दोन वर्षे कोरोनामुळे निर्बंधात अडकलेली ही यात्रा यंदाच्यावर्षी भाविकांनी खुल्या मनाने साजरी केली. ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता.
बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सोनेश्वर याठिकाणी सकाळी 8 च्या सुमारास पोहचले. त्यानंतर बगाड्या बाळासाहेब मांढरे यांना कृष्णा नदीत विधीवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. बगाड्याला वाजत गाजत बगाडाजवळ नेण्यात आले. त्याला पारंपरिक पध्दतीचा पोषाख घालून बगाडास टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले.
बगाडाचा गाडा ओढण्यास सकाळी 10.30 च्या सुमारास सुरूवात झाल्यानंतर ठिकठिकाणी विसावा घेऊन बैल बदलण्यात आले. बगाडाबरोबर वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले. सोनेश्वर येथे बगाडाचा प्रारंभ झाल्यानंतर उभारलेल्या मंडपात बावधन युवा ग्रामस्थ मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.
बगाड वाई-पाचवड रस्त्यावर बावधन फाटयावर दुपारी 3 च्या सुमारास पोहचले. बगाड रस्ता व सोनेश्वर येथे रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, मिठाई, खेळणी, थंडपेयांची व फळांची दुकाने, रसाची गुर्हाळे, देवांच्या फ्रेमची, कटलरीची दुकाने थाटण्यात आली होती. वाई व परिसरातील हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद लुटला व दर्शन घेतले.
बगाड गाड्यास शेतातून जाताना एका वेळी 12 बैल जुंपले जात होते. कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर 4 बैल जुंपून बगाड ओढण्यात आले. ग्रामस्थांनी बगाडासाठी बैल धष्टपुष्ट केले होते, यासाठी शेतकर्यांनी दोन महिन्यापासून आपल्या बैलांची निगा राखून त्यांना खुराक देेऊन तयार केले होते. हे खिलारी बैल पाहण्यासाठी शेतकरी लोक आर्वजून लांबून येत असतात.
गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेर्या काढण्यात आल्या. बगाड परिसरात मुंबईच्या व स्थानिक विविध संस्था, मंडळांनी भाविकांच्या सोईसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वाई, बावधन, भुईंज, कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथके रुग्णवाहीकेसह तैनात करण्यात आले होते. वाई नगरपरिषदेचे अग्निशामक वाहन बावधन हायस्कूल येथे सज्ज ठेवण्यात आले होते.
सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बगाड गावात पोहचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला.
बगाड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बगाड गाडयाच्या पुढे व पाठीमागे ट्रक्टरवर लाउडस्पीकरची सोय करून कृषी भुषण शशिकांत पिसाळ, माजी सभापती दिलीप पिसाळ, सरपंच, उपसरपंच पोलीस पाटील, व प्रतिष्ठित मान्यवर ध्वनिक्षेपकावरून बगाडाबाबत सुचना देत होते. अनेक भाविकांनी दिलेल्या देणग्यांचा पुकारा यावेळी करण्यात येत होता. तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सुचना देण्यात येत होत्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जाणवे-खराडे, केंद्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, कराडचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, मोहन इंगळे, भागवत, रविंद्र तेलतुंबडे, 8 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 68 पोलीस अंमलदार, 33 होमगार्ड व 1 स्ट्रायकींग फोर्स असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलीस कर्मचारी यात्रेसह वाहतूकीवरही नियंत्रण ठेवत होते.
COMMENTS