सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गावात स्वच्छ पाणी, भरपूर फळाची झाडं, उत्तम दर्जाचे शिक्षण, सर्वत्र स्वच्छता, निराधार लोकांचा संभाळ आणि लोकसंख्यावाढीस आवर या सहा गोष्टींवर लक्ष द्यावे. गावाचे आयुर्मान शंभर वर्ष झाले पाहिजे.
असे सांगत ग्रामसेवक 'कपिला गाय' आहे त्याला ढोसण्याऐवजी जरा जीव लावावा. आणि थोडे महिलांच्या विचाराने काम करावे. कारण महिलांनी डोक्यात घेतलं की गाव सुधारायचं रहात नाही, असे मत पाटोदा आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले.
करंजेपुल (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या जनता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे होते.
यानिमित्ताने गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणवंत पुरस्काराने गौरव करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, सदस्या मेनका मगर, निवृत्त अधिकारी रमाकांत गायकवाड, सराफांचे नेते किरण आळंदीकर, एस. एस. गायकवाड, सोमेश्वरचे माजी संचालक विशाल गायकवाड, विद्यमान संचालक ऋषी गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड, कैलास मगर, महेश शेंडकर , आबा यादव, श्रीकांत शेंडकर, उषा जाधव, शमिका दगडे उपस्थित होते.
पेरे पाटील म्हणाले, तुम्ही आम्ही नेहमी सरकारला दोष देत राहतो. पण त्यांना ऐकायला येत नाही. दोषी आपण असतो. लोकांना एक केले तर विकासाला वेळ लागत नाही. ते पण बहुजनाचच पोरगं असतं. निवडणुकीत पडलेले त्याला फार त्रास देतात. त्याला जीव लावावा. नाहीतर सारखा मिटींगा लावेल. ग्रामसेवक फक्त निवडणुकीत पडलेल्या माणसाला भितो. ग्रामसेवक, सरपंच, सदस्य यांचा मेळ घाला, काल काय झालं सोडून द्या, गावगुंडकी व पक्ष बाजूला ठेवा असा सल्लाही दिला.
मैला, गटार, फुलं, राख सगळं पाण्यात टाकतो हे बदलावं लागेल. पाणी स्वच्छ करू शकत नसू तर खराब तरी करू नये. बाजारात केमिकलयुक्त फळे येतात. आपण फळाची झाडं लावावीत. समुद्रात प्लास्टिकचे डोंगर झाले. प्लास्टिक बंद करावं. विज्ञानासाठी शिक्षण चांगल पाहीजे. गावातील निराधार लोकांना सांभाळलं पाहिजे. लोकसंख्या अनेक प्रश्न उभे केले. हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, पाटोदा तिन्ही गावातील माणूस आमदार झालेला नाही तरी गावं मोठी झाली.
सरपंच वैभव गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. युवराज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर ग्रामसेविका सुजाता आगवणे यांनी आभार मानले.
---------------------
एकेक वर्ष सरपंच वाटून घेण्याची पद्धत चुकीची आहे. यात गावाचंच नुकसान आहे. मी पंचवीस वर्ष सरपंच होतो तरी सगळं कळालं नाही. ह्यांना वर्षात काय कळत असेल, असा सवाल पाटोदा आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केला. तसेच, मतासाठी सरपंच, सदस्य मवाळ झाले तर वसुली संपली म्हणून समजा. चांगल्या कामासाठी थोडी कडक भूमिका घ्यावी, युक्ती वापरावी असे पेरे पाटील म्हणाले.
COMMENTS