सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
चालू गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या ऊसाला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने टनाला २८०० रुपये पहिली उचल जाहीर केली असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे दि.३१ डिसेंबर २४ पर्यंत गाळपााठी आलेल्या ऊसाचा पहिला उचल दि. १० जानेवारी २५ रोजी सभासदांना अदा करण्यात येणार आहे. आपल्या कारखान्याची एफआरपी २६०५ रुपये असून यामध्ये अधिकचे टनाला १९५ रुपये जादा अदा करण्यात येत आहेत. एफआरपीच्या नव्या सूत्रानुसार १०.२५% उताऱ्यानुसार एफआरपी चा पहिला हप्ता दिला जातो. तर हंगाम संपल्यानंतर अंतिम साखर उतारा निश्चित झाल्यावर एफआरपी ची अंतिम रक्कम निश्चित होते. हंगाम संपल्यावर पंधरा दिवसात एफआरपीचा उर्वरित फरक देणे बंधनकारक आहे. यानुसार सोमेश्वरची अंतिम एफआरपी ३१२० ते ३१५० च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उर्वरित ३२० ते ३५० रुपये हंगाम संपल्यावर दिले जाणार आहेत.
याबाबत बोलताना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, सद्या पहिल्या उचलीपोटी टनाला २८०० रुपये देत आहोत. कारखाना बंद झाल्यावर एफआरपी ३२० ते ३५० रुपये उर्वरित फरक दिला जाणार आहे. हा दर देत असताना दरवर्षी प्रमाणे सोमेश्वर कारखाना राज्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत अंतिम दराबाबत कुठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.