सोमेश्वर पोर्टल टीम-------
जेजुरी : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील आंबळे येथील जगताप वस्तीवर शेतातील विहिरीतील पाण्याच्या बारीवरून भांडणं झाल्याने एका शेतकऱ्याचा धारदार चाकूने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अविनाश मल्हारी जगताप यांचा खून झाला आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी आरोपी बाळूदास काळूराम जगताप (वय ५५, रा. आंबळे. ता पुरंदर, जि. पुणे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे गावच्या हद्दीतील जगताप वस्ती येथे अविनाश मल्हारी जगताप यांची शेतजमीन आहे. त्यांचा शनिवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी नऊ वाजता शेतातील विहिरी मधील पाण्याच्या बारीवरून आरोपी बाळूदास जगताप यांच्याबरोबर वाद झाला होता. दरम्यान आरोपीने खिशातील धारदार चाकू काढून अविनाश जगताप यांचेवर सपासप वार केले. यामुळे अविनाश जगताप यांचा मृत्यू झाला आहे. घटनेच्या ठिकाणी उपस्थित असणारे अविनाश जगताप यांचे वडील मल्हारी जगताप, गणेश जगताप यांच्यावरही आरोपीने धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केले. याबाबत सौरभ दत्तात्रय जगताप यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महेश पाटील, पोलीस हवालदार दशरथ बनसोडे, विठ्ठल कदम यांनी घटनास्थळी जावून आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी आरोपी काळूदास जगताप याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.